जळगाव – शेतीप्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी आंदोलनस्थळी न आल्याने बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांनी बळजबरीने प्रवेशद्वार उघडून आतमध्ये प्रवेश केला. परिणामी, शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की देखील झाली.
राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये सोमवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याच धर्तीवर जळगावमध्येही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या माध्यमातून काळ्या फिती लावून तसेच काळे कपडे घालून सरकारचा निषेध करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करून केळी, कापूस, कांदा, मका, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. शिवसेनेचे (उद्वव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि बच्चू कडू यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. या प्रसंगी शेतकऱ्यांसमोर बोलताना माजी खासदार पाटील तसेच बच्चू कडू यांनी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका केली. यावेळी बच्चू कडू यांनी मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला.
याप्रसंगी केळीचे भाव बऱ्हाणपुरातून काढले जात असले, तरी त्यातून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे यापुढे केळीचे भाव जिल्ह्यात काढले जातील, अशी व्यवस्था करण्यात यावी. कापूस, ज्वारी खरेदी संदर्भात निर्माण झालेल्या समस्यांवर तातडीने तोडगा काढावा. केळी पिकविम्याच्या अडचणी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी. विदर्भातील धान पिकाप्रमाणे कापूस आणि केळीला बोनस जाहीर करावा. कापूस भावांतर योजना लागू करावी आणि दूध उत्पादकांना अनुदान द्यावे, या काही मागण्यांचा उहापोह माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केला. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी यावे, असाही आग्रह त्यांनी धरला.
मात्र, बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही जिल्हाधिकारी किंवा दुसरे कोणी अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही. त्यामुळे माजी खासदार पाटील आणि बच्चू कडू हे शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. परंतु, पोलिसांनी आधीच मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस बळाला न जुमानता बळजबरीने मुख्य प्रवेशद्वार उघडले. आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या लोखंडी चॅनेल गेटवर उभ्या असलेल्या पोलिसांचा विरोध मोडीत काढून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळवला. आंदोलकांच्या भावना समजून घेत अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. त्यानंतर कुठे वातावरण निवळले. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात माजी खासदार पाटील आणि बच्चू कडू शेतकऱ्यांसह थांबून होते.