जळगाव :शहरातील महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याच्या कामाला अलिकडे गती देण्यात आली असून, सदरचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. संबंधित यंत्रणेला ३१ मेअखेर काम पूर्ण करण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले असताना, प्रत्यक्ष कामाची काय स्थिती आहे, त्याची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.
पाळधी ते तरसोद दरम्यानच्या महामार्ग बाह्यवळण रस्त्याचे काम इंदूर येथील अग्रोह इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. एकूण १८ किलोमीटरचे काम पूर्ण करण्यासाठी निविदा मंजुरीच्या वेळी २६ महिन्यांची मुदत होती. प्रत्यक्षात बाह्यवळण रस्त्याचे काम विविध कारणांनी रखडत गेले. जळगाव शहरातील वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन नंतर महामार्ग विकास प्राधिकरणासह संबंधित कंत्राटदाराची यंत्रणा कामाला लावली.
३१ मे पर्यंत सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर उड्डाणपूल उभारण्याकरीता सलग काही दिवस वाहतूक बंद करण्याची आवश्यकता भासल्यावर, त्यासाठी पुढाकार घेतला. परिणामी, उशिरा का होईना गिरणा नदीसह पश्चिम व मध्य रेल्वेच्या मार्गावरील मोठे पूल तसेच कानळदा, ममुराबाद, असोदा आणि तरसोद रस्त्यांवरील मध्यम उड्डाणपुलांच्या कामाला गती मिळाली.
सद्यःस्थितीत गिरणा नदीवरील सर्वात मोठ्या पुलाचा शेवटचा स्लॅब टाकण्याची तयारी सुरू आहे. पुलाच्या दोन्ही बाजुचे माती काम पूर्ण झाले आहे. पाळधी गावाजवळील पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील उड्डाणपुलाचे मातीच्या भरावासह स्लॅब टाकण्याचे कामही १५ दिवसात पूर्ण होईल. अशाच प्रकारे मध्य रेल्वेच्या मार्गावरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मधल्या अंतरातील कानळदा, ममुराबाद व असोदा रस्त्यावरील मध्यम उड्डाणपुलांसह त्यांच्या जोड रस्त्यांचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. काही ठिकाणी रंगरंगोटी देखील केली जात आहे.
महामार्ग बाह्यवळण रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पूर्णत्वास आलेल्या कामांची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण तृतीय पक्ष तपासणी पूर्ण करेल. जून महिन्यात सर्व कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे – आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)