जळगाव – शहरातील जुने जळगावसह शिवाजीनगर, भवानी पेठ, पोलन पेठ, मारूती पेठ, नवी पेठ, मेहरूण, पिंप्राळा गावठाण भागात अजूनही बरेच जुने वाडे आणि धोकादायक इमारती आहेत. महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करून १०७ मालमत्ता धारकांना खबरदारीचा उपाय म्हणून जाहीर नोटीस बजावली आहे.

महानगरपालिका अधिनियमातील कलम २६४ व २६८ अन्वये, मोडकळीस आलेली किंवा कोसळण्याच्या स्थितीत असलेली कोणतीही इमारत किंवा जुना वाडा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करत असल्याचे निदर्शनास आल्यास, मालकासह भोगवटाधारक किंवा रहिवाशांना लेखी तसेच जाहीर नोटीस बजावली जाते. या नोटीसीमध्ये जीर्ण इमारत तसेच वाडा दुरूस्त करणे, पूर्णतः पाडून टाकणे किंवा त्यातून रहिवासी, वापरकर्ते यांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या जातात. आपत्कालीन परिस्थितीत महापालिका प्रशासनाला धोकादायक वास्तू पाडणे किंवा आवश्यक तिथे तात्पुरती दुरुस्ती करण्याचा अधिकार देखील आहे. त्यासाठी झालेला सर्व खर्च संबंधित मालकाकडून किंवा भोगवटाधारकाकडून वसूल करण्याची तरतूदही अधिनियमात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जळगाव महापालिका प्रशासनाकडूनही दरवर्षी धोकादायक वाडे व इमारतींच्या मालकांना नोटीसा देण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. प्रत्यक्ष, पुढे कार्यवाही काहीच होत नाही. त्यामुळे शहरात वर्षानुवर्षांपासून जीर्ण धोकादायक इमारती तशाच उभ्या आहेत. त्यापैकी काही अचानक कोसळल्या देखील आहेत. यंदाही, महापालिकेने एकूण १०७ मालमत्ता धोकादायक ठरवून संबधितांना नोटीस बजावली आहे. अतिवृष्टीसह इतर कोणत्याही कारणांनी असुरक्षित इमारत कोसळून अपघात झाल्याने जीवित अथवा वित्तीय हानी झाल्यास संबंधित मालक जबाबदार राहिल, असेही महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी जाहीर नोटीसीत म्हटले आहे.