जळगाव – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील मुक्ताईनगरात शुक्रवारी सायंकाळनंतर संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. दौरा आटोपून त्याच दिवशी रात्री उशिरा मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना, नियोजित वेळेपेक्षा विमानाचे उड्डाण होण्यास उशीर झाला. नेमका हा उशीर जामनेर तालुक्यातील एका महिला रुग्णाच्या पथ्यावर पडला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित महिलेला आपल्या विमानातून मुंबईला नेण्याची तत्परता दाखवली.
जामनेर तालुक्यातील शहापूर येथील रहिवासी असलेल्या शीतल बोर्डे (३५) या मूत्रपिंडाने त्रस्त असून, त्यांच्यावर काही वर्षापासून डायलिसीसचे उपचार सुरू आहेत. शीतल यांच्या कुटुंबियांनी मुंबईतील एका रूग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अर्ज केला होता. संबंधित रुग्णालयाने मूत्रपिंड दाता उपलब्ध झाल्याची माहिती दिली. रुग्णाने वेळेत मुंबईत पोहोचावे, असा संदेश शुक्रवारी पाठवला. त्यानुसार शीतल आणि त्यांचे पती आनंद बोर्डे हे लगेचच जळगाव विमानतळावर दाखल झाले. मात्र, नियोजित विमान निघून गेल्यामुळे त्यांची मोठी निराशा झाली.
शीतल बोर्डे यांचे बंधू आणि जामनेर तालुक्यातील शहापूरचे सरपंच जितेंद्र पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना त्याबाबत माहिती दिली. मंत्री महाजन यांनीही त्यांच्या समवेत मुक्ताईनगर दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा केली. शिंदे यांचे वैयक्तिक विमान मुंबईकडे निघणार होतेच. त्या विमानास वैमानिकाने शारीरिक थकव्याचे कारण दिल्याने नियोजित वेळेपेक्षा थोडा उशीर झाला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फार आढेवेढे न घेता तत्काळ शीतल बोर्डे यांना त्यांच्या एका नातेवाईकासह विमानात जागा दिली. आणि ते मुंबईकडे रवाना झाले. विशेष म्हणजे मुंबईत विमानतळावर उतरल्यानंतर तातडीने एका रुग्णवाहिकेची व्यवस्था करून महिला रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. ज्यामुळे त्या महिलेला योग्य वेळी उपचार मिळू शकले.