नाशिक : कृषी विभागाने शेतकऱ्यांना कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधताना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरुपी भ्रमणध्वनी क्रमांकाची सुविधा सुरू करून शेतकरी व कृषी विभागात समन्वय राखण्यात येणार आहे.
राज्यातील कृषी यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी एक नोव्हेंबरपासून कायमस्वरुपी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध दिले जाणार आहे. या निर्णयानुसार संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतर त्यांचा तोच भ्रमणध्वनी क्रमांक नवीन अधिकारी, कर्मचाऱ्याकडे हस्तांतरीत केला जाईल. हा निर्णय जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी व सहायक कृषी अधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्व पदांसाठी लागू होणार आहे.
शेतकऱ्यांना आपापल्या भागातील कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी कृषी विभागाकडून जिओ कंपनीचे पोस्टपेड सिम कार्ड देण्यात येणार आहे. यात दर महिन्याला ६० जीबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि तीन हजार लघूसंदेश अर्थात एसएमएसची सुविधा मिळेल. हा प्लॅन कृषी विभागाकडून थेट नियंत्रित केला जाईल. महत्वाचे म्हणजे हा भ्रमणध्वनी क्रमांक फक्त शासकीय कामकाजासाठीच वापरता येणार आहे.
या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना फायदा होणार असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. कृषी अधिकारी, कर्मचारी यांची बदली झाली तरी भ्रमणध्वनी क्रमांक बदलणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि संपर्क कायमस्वरुपी उपलब्ध राहील. एकाच क्रमांकामुळे संपर्कात सातत्य राहील. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना, तंत्रज्ञान आणि हवामानविषयक माहिती तात्काळ मिळण्यास मदत होईल. तक्रारी नोंदवणे किंवा अडचणी मांडणे अधिक सोपे आणि जलद होईल. त्यामुळे तक्रार निवारण प्रणाली अधिक प्रभावी होईल, असा विश्वास कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे. पीक सल्ला, कीड-रोग व्यवस्थापन किंवा कोणत्याही कृषी विषयक समस्येवर संबंधित अधिकाऱ्याचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध राहील. अधिकारी बदलल्यास नवीन क्रमांक शोधण्यात किंवा संपर्क साधण्यात लागणारा वेळ वाचेल. हा निर्णय शेतकरी व कृषी विभागातील समन्वय अधिक मजबूत करेल आणि शेतकऱ्यांपर्यंत माहिती आणि सेवा तत्काळ पोहोचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे नाशिकचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी म्हटले आहे.
