नाशिक – मारकडवाडीतील मतदानाबाबत शंका असतील तर, निवडणूक आयोगाने लोकांच्या म्हणण्यानुसार तपास करावा. गडबड झाली असल्यास चौकशी होणे आवश्यक आहे. एखाद्या यंत्रात बिघाड असू शकतो. परंतु, सर्व यंत्रांमध्ये बिघाड होता, असे म्हणणे योग्य नाही, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे मांडली.

ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणाऱ्या मारकडवाडीतील ग्रामस्थांशी रविवारी राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार यांनी संवाद साधला. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावरून आठवले यांनी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी चौकशीची मागणी करतानाच विरोधकांनी पराभव मान्य केला पाहिजे, असा सल्ला दिला. लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्या असता आम्ही ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले नाहीत. विरोधकांनीही चांगली मते मिळाल्यावर मतपत्रिकेवर मतदानाची मागणी केली नव्हती. विरोधकांनी चुकीचा पायंडा पाडू नये. आपली मते का कमी झाली, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आठवले यांनी मांडली.

हेही वाचा : नाशिक : युवक मारहाणीच्या निषेधार्थ पिंपळगावात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील महायुती सरकारमध्ये रिपाइंला विधान परिषदेची एक जागा, एक मंत्रिपद आणि दोन ते तीन महामंडळांवर स्थान देण्याची मागणी करण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची हवा गेली. आपल्याशिवाय सरकार येणार नाही, या त्यांच्या स्वप्नांचा भंग झाला. त्यांना महायुतीत घेऊन काही फायदा होणार नाही. कडवी भूमिका घेत असल्याने महायुतीत मनसेची आवश्यकता नसल्याचा आठवले यांनी पुनरुच्चार केला.