नाशिक : लाडक्या बहीण योजनेविषयी खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. प्रत्येक विभागाचे मुख्य लेखा शीर्ष वेगळे असते. सरकार एका मुख्य लेखाशीर्षातून दुसऱ्या मुख्य लेखाशीर्षात पैसे देऊ शकत नाही. विरोधक जनतेचे मन वळवू शकत नसल्याने ते दिशाभूल करीत असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.शनिवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी विरोधकांकडून होत असलेल्या लाडक्या बहीण योजनेसाठी अन्य विभागांचा निधी वळविला जात असल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
समाजात खोटे कथानक पसरवणारा वर्ग आहे. यापूर्वी संबंधितांनी भाजप निवडून आल्यानंतर संविधान बदलणार असल्याच्या वावड्या उठविल्या गेल्या होत्या. आताही संबंधितांकडून तसाच संभ्रम तयार केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढल्या जातील. पावसाळा संपला की निवडणुकीचे वारे सुरू होईल. राज ठाकरे यांनी विकसित भारतसाठी पाठिंबा दिला होता. त्यांची त्यावेळची भूमिका आणि आताची भूमिका वेगळी आहे. सिंदूर मोहिमेवर राज ठाकरे यांनी अभ्यास करून बोलले पाहिजे. भारताने केलेल्या कारवाईवर बोलले पाहिजे, असे त्यांनी सूचित केले.
नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडे असावे, अशी मागणी आहे. तशीच शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचीही आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आग्रही आहे. चर्चेतून यावर तोडगा काढला जाईल. हा विषय अंतिम टप्प्यात असून लवकरच निर्णय होईल, असा दावा बावनकुळे यांनी केला.