नंदुरबार : शेतकऱ्यांविषयीची वादग्रस्त विधाने आणि विधिमंडळातील रमी प्रकरणामुळे कृषिमंत्री पदावरुन क्रीडामंत्री पदावर पुनर्वसन करण्यात आलेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते आणि नंदुरबारचे पालकमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी राजकीय देखावे सादर करु नयेत, असे आवाहन केले आहे.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीत पालकमंत्री माणिक कोकाटे यांनी सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांबाबत स्पष्ट निर्देश दिले. गणेश मंडळांनी सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही असेच देखावे सादर करावेत. अमली पदार्थ विरोधी तसेच समाजप्रबोधनपर देखावे सादर करण्यास प्राधान्य द्यावे, राजकीय देखावे सादर करू नयेत. राज्य शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे कोकाटे यांनी सांगितले. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्वतंत्र सात कोटी ५० लाखांची आर्थिक तरतूद केली आहे. याशिवाय, नागरिकांच्या जीवितास धोका ठरणाऱ्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांची तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. विसर्जन मार्ग सुरक्षित, प्रकाशमय आणि अडथळामुक्त ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे, असे कोकाटे म्हणाले.
यावेळी कोकाटे यांनी, वीज तारा भूमिगत करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याची सूचना केली. पुढील काळात कार्यवाही जलद व्हावी यासाठी, गणेशोत्सवापूर्वी किमान दोन महिने आधी शांतता समितीची बैठक घेण्याची पद्धत राबवावी, यामुळे समस्या ओळखणे, नियोजन आणि अंमलबजावणी यांना पर्याप्त वेळ मिळेल,असे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकत्र येत असून सर्व समाजबांधवांनी हे सण शांततेत पार पाडावेत. शांतता समितीच्या सर्व सदस्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येईल. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता मंडळाच्या अध्यक्षांनी आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी, नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन कोकाटे यांनी केले. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील विद्युत तारांची दुरुस्ती करावी, असेही त्यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार आणि गुजरातमधील काही गणेश मंडळांची मूर्ती विसर्जनासाठी सारंगखेडा आणि प्रकाशा येथे आणल्या जातात. त्यामुळे तेथील दोन्ही पुलांच्या बाजूंची तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करावी, असेही निर्देश पालकमंत्री कोकाटे यांनी यावेळी दिले.
बैठकीस चंद्रकांत रघुवंशी, आमश्या पाडवी, राजेश पाडवी या आमदारांसह जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, सहायक जिल्हाधिकारी अनय नावंदर, अंजली शर्मा, निवासी जिल्हाधिकारी कल्पना ठुबे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे, डॉ. अभिजीत मोरे, शांतता समितीचे सदस्य व संबंधित विभागाचे प्रमुख, गणेश मंडळांचे पदाधिकारी य उपस्थित होते.