नाशिक – कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजगड कार्यालयाच्या नुतनीकरणात वास्तुशास्त्राचा आधार घेत अनेक फेरबदल केले आहेत. कार्यालयाच्या स्थापनेपासून आजतागायत वास्तूशांती झालेली नव्हती. त्यामुळे आता वास्तूशांती आणि नवचंडी याग करण्यात येणार आहे. कार्यालयास अत्याधुनिक स्वरुप देताना सकारात्मक ऊर्जा तयार होईल, याकडे प्राधान्याने लक्ष दिल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा आहे.
मनसेच्या नाशिक शाखेच्यावतीने त्र्यंबक रस्त्यावरील राजगड या पक्ष कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. यानिमित्त गुरुवारी वास्तूशांती व नवचंडीयाग तसेच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर अल्पावधीत नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला झाला होता. एकेकाळी शहरात पक्षाचे तीन आमदार आणि महापालिकेवर ४० नगरसेवकांच्या माध्यमातून मनसेचा झेंडा फडकला होता. याच काळात ठक्कर बाजार या मध्यवर्ती बसस्थानकालगतच्या इमारतीत पक्षाचे कार्यालय कार्यान्वित झाले.
पुढील काळात पक्षात अनेक घडामोडी घडल्या. विविध कारणांनी काही नेते, पदाधिकारी दुरावले. महापालिकेसह अन्य निवडणुकीत मनसे आपला प्रभाव दाखवू शकले नाही. या घटनाक्रमाचा संबंध प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कार्यालय नुतनीकरण, वास्तूशास्त्र आणि वास्तूशांतीशी जोडला जात आहे. महानगरपालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, मनसेचे कार्यालय अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज करण्यात आले. वास्तुशास्त्रानुसार विविध स्वरुपाचे बदल करण्यात आले. या वास्तूत सकारात्मक ऊर्जा तयार होईल, याचा विचार करण्यात आल्याचे पदाधिकारी सांगतात.
नुतनीकरणात वास्तुशास्त्रानुसार मनसेचे राजगड कार्यालय तयार करण्यात आले आहे. आजपर्यंत या ठिकाणी वास्तूशांती झालेली नव्हती. आता वास्तूशांती व नवचंडी याग करण्यात येणार आहे. कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे, वायफायसह अन्य आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. – दिनकर पाटील (प्रदेश सरचिटणीस, मनसे)