जळगाव : जिल्ह्यातील १६ नगर परिषद आणि दोन नगर पंचायतींसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून सुरू होत आहे. इच्छुक उमेदवारांना त्यांची नामनिर्देशन पत्रे १७ तारखेपर्यंत सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेदरम्यान दाखल करता येणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रमासह जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या, मतदान केंद्र तसेच कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांच्या तयारीची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात भुसावळसह अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर आणि सावदा, या १६ नगर परिषद आहेत. तर शेंदुर्णी, मुक्ताईनगर आणि बोदवड या तीन नगर पंचायती आहेत. बोदवड येथे यापूर्वीच नगर पंचायत अस्तित्वात असल्याने १८ ठिकाणी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे. जिल्ह्यात अंतिम मतदार यादीनुसार, पुरूष मतदारांची संख्या सुमारे चार लाख ५० हजार ८९३ तसेच स्त्री मतदारांची संख्या चार लाख ३८ हजार ९३८ आणि इतर मतदारांची संख्या ८३ इतकी आहे.
या अनुषंगाने ९७७ मतदान केंद्रे, १२९० कंट्रोल युनिट आणि २७४३ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ४६४ सदस्यांसाठी निवडणूक होत असून, त्यात एक सदस्यीय प्रभाग ३४, दोन सदस्यीय प्रभाग २०६ आणि तीन सदस्यीय प्रभाग सहा असणार आहेत. मतदारांना सहा ठिकाणी नगराध्यक्षांसह तीन सदस्यांच्या निवडीसाठी चार मते तसेच २०६ ठिकाणी नगराध्यक्षांसह दोन सदस्यांच्या निवडीसाठी तीन मते देण्याचा अधिकार असेल. दरम्यान, जिल्ह्यात सुमारे ३० हजारावर दुबार मतदार आहेत. त्यांच्याकडून एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचे हमीपत्र भरून घेण्यात आले आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व काळजी घेतली गेल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रत्येक ठिकाणी एकल खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. ज्यामधून बॅनर, पोस्टर, मोर्चा, सभा यांच्या परवानगी स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग यांच्या समन्वयाने दिल्या जातील. जिल्ह्यातील सर्व आर.ओ., ए.आर.ओ. तसेच पोलीस विभाग, महसूल विभाग आणि इतर ७८ विभाग यांची समन्वय बैठक घेऊन संपूर्ण निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान एफएसटी, एसएसटी, व्हिजिलन्स आणि एमसीएमसी, अशा सर्व समित्या गठित करण्यात आल्या आहेत. एकूण ९७७ मतदान केंद्रांसाठी सुमारे पाच मनुष्यबळ प्रति केंद्र अशा प्रमाणात कर्मचारी नेमले जाणार आहेत. त्याच प्रमाणे २० टक्के अतिरिक्त राखीव मनुष्यबळ ठेवले आहे. ईव्हीएमची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली असून, ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअरद्वारे बारकोड स्कॅनिंगची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
● नामनिर्देशन पत्र दाखल : १० ते १७ नोव्हेंबर, सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत
● नामनिर्देशन पत्रांची छाननी : १८ नोव्हेंबर
● नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख : २१ नोव्हेंबर(अपील नसेल तिथे )
● निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी : २६ नोव्हेंबर
● मतदान : दोन डिसेंबर
● मतमोजणी व निकाल : तीन डिसेंबर
