नंदुरबार – जिल्ह्यातील प्रत्येक गटात पावसाळ्यातील अडचणी आणि त्यानुसार करावयाच्या तयारीच्या सूचना संबंधीत यंत्रणांना देण्यात आल्या असून तीन दिवसात यंत्रणांनी गटनिहाय आपत्ती व्यवस्थापनाच्या कृती योजना सादर कराव्यात, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत.

नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली संभागृहात आपत्ती व्यवस्थापन समितीची मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. सेठी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस,, सहायक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, कृष्णकांत कनवरीया यांच्या उपस्थितीत झाली. पावसाळ्यात जिल्ह्यातील किती गावे आणि पाड्यांचा संपर्क तुटतो, आरोग्य यंत्रणा कुठे पोहचू शकत नाही. अशा ठिकाणी संबंधीत यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील किती तलावातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढवू शकतो, याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने लवकरच मदतवाहिनी नंबर जाहीर केला जाणार असून प्रांतअधिकारी आणि तहसीलदार यांना त्यांच्या स्तरावरच्या खालील यंत्रणांच्या बैठका घेवून दिलेल्या सूचना आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, मृदू व जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग या जिल्हाबाह्य यंत्रणांची देखील पुढच्या आठवड्यात तातडीने बैठक घेण्यात येणार आहे. पावसाळ्यातील साथीच्या आजारांना कसे टाळता येईल, याबाबत आरोग्य यंत्रणांनी उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात खासकरुन शहरी भागात गटारी तुंबणार नाही, याविषयी दक्षता घेण्याच्या सूचना नगरपालिका यंत्रणांना घ्यायच्या असून याबाबत तातडीने नाले सफाई अभियान राबविण्याचे संबंधीत यंत्रणांना सांगण्यात आले. बांधकाम विभागाबरोबर देखील भूस्खलनाच्या अनुषंगाने असलेल्या ठिकाणांविषयी उपाय करण्याबाबत सांगण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरुपाचे अत्यावश्यक काळासाठी हेलीपॅड बनविण्याबाबत देखील सूचना देण्यात आल्या आहेत.