नाशिक : मे महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात जिल्ह्यातील १२ हजार १५६ हेक्टरवरील पिकांचे ३५.२१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. १४६९ गावांमध्ये ३५ हजार ७५७ शेतकरी बाधित झाले. या संदर्भातील अंतिम अहवाल प्रशासनाने राज्य शासनाला सादर करीत निधीची मागणी केली. दरम्यान, शुक्रवारी रात्री अनेक भागात पावसाचा तडाखा बसला.
मागील महिन्यात यंदा सलग तीन ते चार आठवडे वळिवाचा पाऊस झाला. प्रारंभी गारपीट व नंतर वादळी पाऊस असे त्याचे स्वरुप होते. मे महिन्यातील पावसाचे सर्व विक्रम मोडीत निघाले. पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. पंचनाम्यानंतर संयुक्त अंतीम अहवाल तयार झाला असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या अटीनुसार नुकसानीचा अंदाज काढण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक ७५५७ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. भाजीपाला ९३३ हेक्टर, मका ३८३, टोमॅटो – ३१८, बाजरी १४८ आणि भुईमुग ११८ हेक्टरचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. ९४९४ हेक्टरवरील बागायत पिकांचे २५.६३ कोटींचे नुकसान झाले. बागायत पिके असणाऱ्या ९५७ गावातील २१ हजार ८४ आणि बहुवार्षिक फळपिकाखालील ५१२ गावांतील १४ हजार ६७३ अशा एकूण १४६९ गावांमधील ३५ हजार ७५७ शेतकरी बाधित झाले.
अडीच हजार हेक्टरवरील आंब्याला फटका
आंबे तयार होण्याच्या मार्गावर असताना वादळी पाऊस झाला. जिल्ह्यातील २४४१ हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाले. १९१ हेक्टरवरील डाळिंब, साडेचार हेक्टरवरील द्राक्ष, १४ हेक्टरवरील चिकू, असे एकूण २६६२ हेक्टरवरील बहुवार्षिक फळांचे नऊ कोटी ५८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
नुकसानीचे सत्र कायम
मुसळधार पावसाने नुकसानीचे सत्र कायम राहिले. निफाड, देवळा तालुक्यात अनेक भागात घरांचे पत्रे उडून गेले. दहीवड येथील जिजामाता विद्यालयाचे पत्रे उडाले. कसबेसुकेणे येथील सदाशिव शेवकर यांची गाय वादळी पावसात मृत झाली. तर पेठच्या निरगुडे येथील नामदेव थाळकर यांची एक बैल व एक गाय मरण पावली. या बाबतची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.