नाशिक : आगामी कुंभमेळा, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी शहरातील भाजपच्या तिनही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे मंत्रालयात एकत्रित भेट घेतली. शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, वाढती गुन्हेगारी, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, सिंहस्थाची कामे देतांना स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देणे आदी मुद्दयांवर चर्चा झाली. सिंहस्थाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद करून लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी तीनही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री दादा भुसे यांनी सोमवारी पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली होती. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे. गुन्हेगारीला लगाम घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे, रस्त्यावर उतरून तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना भुसे यांनी केल्या होत्या. या बैठकीतून शिवसेना शिंदे गट अप्रत्यक्षपणे गृह विभागाला लक्ष्य करीत असल्याची साशंकता राजकीय वर्तुळात व्यक्त झाली. या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी भाजपच्या शहरातील तीनही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हयात अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे कधी नव्हे इतके नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरात रोजच घडणाऱ्या हाणामाऱ्या, खून, लूटमार, वाहनांची तोडफोड या गंभीर गुन्हयांमुळे शहरवासीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या संदर्भात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत सीमा हिरे, राहूल ढिकले, देवयानी फरांदे या तिघा आमदारांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

आमदार आणि मुख्यमंत्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. सिंहस्थासाठी करावयाची विकास कामांवर विचार विनिमय झाला. सिंहस्थासाठी दुसऱ्या टप्प्यात करावयाच्या कामांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी तिन्ही आमदारांनी बैठकीच्या सुरूवातीस केली. पावसामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरीव आर्थिक मदत द्यावी याबरोबरच शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी मनुष्यबळात वाढ करून गुन्हेगारांच्या विरोधात ठोस कारवाई अत्यंत गरजेचे असल्याचे आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रस्तावित नाशिक – पुणे रेल्वेमार्ग शिर्डीमार्गे न नेता पुणे -संगमनेर -नाशिक असाच असावा, अशी आग्रही मागणी तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.