नाशिक : बागलाण तालुक्यातील चिराई येथील कांदा उत्पादकाची फसवणूक करणाऱ्या चार व्यापाऱ्यांविरूध्द जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागलाण तालुक्यातील चिराई येथील भाउसाहेब अहिरे (४६) यांची कांदा शेती आहे. त्यांची संशयित राजेंद्र अहिरे, युवराज पाटील, मयूर पाटील, अशोक अहिरे (रा. चिराई) यांच्याशी कांदा खरेदी करतांना ओळख झाली.

भाऊसाहेब यांच्याकडून १८ लाख ३१ हजार ८१९ रुपये किंमतीचे कांदे चौघांनी खरेदी केले. परंतु, पैसे दिले नाही. वेळोवेळी याविषयी विचारणा केली असता अशोकने भाऊसाहेब यांना शिवीगाळ, दमदाटी केली. काहींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भाऊसाहेब यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणाला अटक नाही. शेतकऱ्यांनी व्यापारी किंवा अन्य घटकाकडून शेतमाल खरेदी करतांना फसवणूक झाली असल्यास संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.