नाशिक – मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात वळण रस्त्यांसाठी जागा ताब्यात घेऊन प्रदीर्घ काळापासून बाधितांना मोबदला न देता ठराविक बांधकाम व्यावसायिकांना मात्र या काळात ९५५ कोटींचा मोबदला प्राधान्यक्रम डावलून दिल्याची तक्रार शेतकरी कृती समितीने पुन्हा एकदा केली. तत्काळ मोबदला न दिल्यास संबंधित रस्त्यांवर नांगर फिरवून शेती केली जाईल, असा इशारा समितीने दिला आहे.

मागील महिन्यात काही बांधकाम व्यावसायिकांच्या भूसंपादनासाठी महापालिकेने ५५ कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केल्यावरून महापालिकेत रणकंदन माजले होते. ताब्यात दिलेल्या जागेचा मोबदला न दिल्यावरून शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत माजी स्थायी सभापती उद्धव निमसे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत धडक दिली होती. मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या देत घोषणाबाजी केली होती. जवळपास महिनाभरापासून रजेवर असणारे आयुक्त डॉ. अशोक करंजकर हे सोमवारी महापालिकेत दाखल झाले. त्यांनी शेतकरी कृती समितीला चर्चेसाठी बोलावले. यावेळी डॉ. करंजकर यांनी आठ दिवसांत संबंधित बैठक घेऊन विषय समजावून घेत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस शेतकऱ्यांनाही निमंत्रित केले जाणार असल्याचे निमसे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – अनेर, हतनूरमधून विसर्गामुळे जळगाव, धुळ्यातील नदीकाठच्या नागरिकांना इशारा

हेही वाचा – नाशिक : मार्कंडेश्वर डोंगरावर बंदी झुगारुन भाविकांची गर्दी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी कृती समितीने महापालिकेने वळण रस्ता, जत्रा रोड, हनुमाननगर ते गोदावरी मध्य वळण रस्ता, पेठे कामगारनगर ते गोदावरी वळण रस्त्यासाठी जागा ताब्यात घेऊन रस्ते तयार केले. तेव्हा मनपाने मोबदला देण्याचे पत्र दिले. त्यास २२ वर्षांचा कालावधी लोटला. २०१३-१४ मध्ये रस्ते ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना पुन्हा मोबदला देण्याचे पत्र दिले. या प्रक्रियेला १० वर्ष लोटूनही बाधितांना आजतागायत मोबदला मिळाला नाही. दुसरीकडे बांधकाम व्यावसायिकांना या १४ वर्षांच्या काळात ९५५ कोटींचा मोबदला प्राधान्यक्रम डावलून दिल्याची तक्रार केली. याची चौकशी करून पुढील काळात ज्या जागा ताब्यात घेतल्या आहेत, त्यांना व्याजासह मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आयुक्तांची भेट घेऊन समाधान झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तत्काळ मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर फिरवून शेती केली जाईल, असा इशाराही शिष्टमंडळाने दिल्याचे उद्धव निमसे यांनी सांगितले.