नाशिक – महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये पडलेली दरी दिवसागणिक वाढत असून ही जागा भाजपला देऊ नये म्हणून ठाण्यात शक्ती प्रदर्शन करणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांवर भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या दिनकर पाटील यांनी आगपाखड केली आहे. शिंदे गटाची स्थानिक पातळीवर ताकद नाही. शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवू नये. भाजपचे कार्यकर्ते गोडसेंना मदत करणार नाहीत. असे सुतोवाच पाटील यांनी केल्याने भाजप-शिवसेनेतील बेबनाव उघड झाला आहे.

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या टप्प्यात म्हणजे २० मे रोजी मतदान होणार आहे. २६ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. या प्रक्रियेस महिनाभराचा कालावधी असल्याने महायुतीच्या नेत्यांनी नाशिकच्या जागेचा विषय तूर्तास बाजुला ठेवला आहे. या स्थितीत जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये संघर्षाला नवी धार आली आहे. सलग दोन वेळा शिवसेनेचे हेमंत गोडसे हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे ही जागा अन्य कुणाला देऊ नये, अशी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. या अनुषंगाने त्यांनी रविवारी रात्री ठाणे येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या देत शक्ती प्रदर्शन केले. त्यामुळे स्थानिक पातळीवर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

हेही वाचा – राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार

नाशिकच्या जागेबाबत याआधीच भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कमी लेखण्यास सुरुवात केली होती. समर्थकांना ५० वाहनांमधून घेऊन ठाण्यात जाणाऱ्या गोडसे यांच्यावर भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी टीकास्त्र सोडले. नाशिक मतदारसंघ भाजपला मिळावा, यासाठी भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी सरचिटणीस विजय चौधरी यांच्यासमोर उपोषण सुरू केले होते. नेत्यांच्या आश्वासनामुळे ते थांबले. शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. महापालिकेत एकहाती सत्ता होती. बुथस्तरीय यंत्रणा आहे. दुसरीकडे शिंदे गटाची ताकद नाही. त्यांचे फारसे नगरसेवकही नव्हते. त्यामुळे ही जागा भाजपला मिळणार असल्याचा दावा पाटील यांनी केला. भाजपने गोडसेंना दोन वेळा निवडून दिले. पंतप्रधान आणि भाजपच्या नेत्यांचे छायाचित्रही त्यांनी कधी लावले नाही, असा आरोपही पाटील यांनी केला आहे. स्थानिक नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी सेना-भाजपमधील वितुष्टात भर पडत आहे.

हेही वाचा – नीट, एमएचटी-सीईटी एकाच दिवशी, सीईटी सेलवर दोनच दिवसांत पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ!

हेही वाचा – साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्याला शिवसेनेची ५० वाहनेही गेली नव्हती. शक्ती प्रदर्शनाचे हेमंत गोडसे यांनी केवळ नाटक केले. आम्ही पाच हजार गाड्या नेऊ शकतो. पण पक्षशिस्तीत ते बसत नाही. गोडसे हे हुशार असतील तर त्यांनी निवडणुकीस उभे राहू नये. भाजपचे कार्यकर्ते त्यांना मदत करणार नाहीत. मतदारसंघात गोडसेंबद्दल तीव्र नाराजी आहे. – दिनकर पाटील (माजी सभागृह नेते, इच्छुक उमेदवार, भाजप)