नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य वाटेल असाच निर्णय घेतला जाईल, असे संकेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात दिले.
सोमवारी त्यांनी स्थानिक पातळीवरील निवडक प्रमुख पदाधिकाऱ्यांशी तासभर चर्चा केली. मागील काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. बैठकीत त्या अनुषंगाने काहींनी हा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले जाते. सर्व पक्षांच्या युती व आघाड्या आहेत. आम्हालाही अनेकदा विचारणा होते, तेव्हा मनसेचे प्रमुख जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल असे उत्तर देतो, याकडे संबंधितांनी लक्ष वेधले.
तेव्हा राज यांनी संबंधितांकडून दिल्या जाणाऱ्या उत्तराचे समर्थन केले. तुम्ही जे सांगत आहात, ते बरोबर आहे. सध्यापुरते तेवढे खूप आहे. आपण घेऊ तो निर्णय सर्वांना मान्य असेल ना, हे एकदा त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून वदवून घेतले. तुम्हाला योग्य वाटेल, असाच निर्णय घेतला जाईल, असे राज यांनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले. या बैठकीतून त्यांनी युतीबाबत चाचपणी केल्याचे सांगितले जाते.
बैठकीत गटबाजी संपवून पक्ष संघटना मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिल्याचे दिसून आले. स्थापनेपासून पक्षात सक्रिय असणाऱ्या आणि मध्यंतरी थांबून घेतलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी तयार करा. कुणी नाराज असेल तर त्यांची नाराजी दूर करा, सर्वांना सोबत घ्या, या संदर्भातील संपूर्ण माहिती संकलित करून ती पुढील चार-पाच दिवसांत सादर करावी, असे निर्देश देत त्यांनी पक्ष संघटनेत फेरबदल करण्याचे संकेत दिले.