जळगाव – सिंहस्थ कुंभमेळा दोन वर्षावर आलेला असताना, नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसून, विकास कामांनाही चालना मिळालेली नाही. मात्र, काही जण आपल्यालाच पालकमंत्री करा, म्हणून लाचार झाले आहेत. वास्तविक पालकमंत्रीपद हे स्वाभिमानाने मिळाले पाहिजे, असा टोला हाणत राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले.

तापी खोरे महाकाय पुनर्भरण प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सामंजस्य करार झाल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनी हा प्रकल्प मार्गी लागत असल्याचा प्रचार जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, खडसे यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. आपण पाटबंधारे मंत्री असताना, सदर प्रकल्पाचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचीच फलश्रुती म्हणून तापी नदीवरील प्रस्तावित महाकाय पुनर्भरण प्रकल्पासाठी दोन्ही राज्यात सामंजस्य करार झाला. सुमारे १९ हजार २४४ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून एकूण ३१.१३ टीएमसी पाण्याचा वापर केला जाणार असून, त्यातील ११.७६ टीएमसी पाणी मध्य प्रदेशच्या तर १९.३६ टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आमदार खडसे यांनी त्यांचे कट्टर विरोधक मंत्री महाजन यांच्यावरही टीका केली. पत्रकार अनिल थत्ते आणि आणखी एका व्यक्तीने आपल्याविरुद्ध खोटे, बेपर्वा आणि निराधार आरोप केल्याचा दावा करून त्यांच्या विरोधात मंत्री महाजन यांनी न्यायालयात मानहानीचे प्रकरण दाखल केले आहे. त्या प्रकरणी आमदार खडसे यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठविल्याचा दावाही मंत्री महाजन यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. परंतु, आपणास फक्त साधारण नोटीस मिळाल्याचे खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.