जळगाव: हिट अँड रनप्रकरणी कायद्यातील नवीन तरतुदींच्या निषेधार्थ इंधन वाहतूक करणार्‍या मालमोटारचालकांनी सोमवारपासून तीन दिवस संप पुकारला आहे. संपाबाबतची माहिती मिळताच, पेट्रोल मिळेल की नाही, या धास्तीने शहरासह जिल्ह्यातील विविध पेट्रोलपंपांवर सोमवारी सायंकाळनंतर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. चालकांचा टाक्या पूर्णक्षमतेने भरून घेण्याकडे कल होता. मंगळवारी सायंकाळपर्यंत कायद्याबाबत तोडगा निघू शकतो, अशी शक्यता जिल्हा पेट्रोलपंपचालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांनी व्यक्त केली आहे.

मालमोटार चालकांच्या संपामुळे पेट्रोल-डिझेल-गॅस सिलिंडर यांसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प झाला असून, फळे, भाजीपाला, दूध, शेतीमाल यांसारख्या वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. शिवाय, शहरासह बाजार समित्यांमध्ये मालाची आवक कमी झाल्याचे दिसून आल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात सुमारे दोनशे पेट्रोलपंप असून, सोमवारी सायंकाळी निम्म्यावर पंपांवर खडखडाट झाला होता. मंगळवारी दुपारपर्यंत पुरेल एवढाच पंपांवर साठा शिल्लक आहे. पहाटेपासून लागलेल्या वाहनांच्या रांगा पाहता तोही दुपारपर्यंत संपेल, असे जिल्हा पेट्रोलपंपचालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांनी सांगितले.

हेही वाचा… राष्ट्रीय युवा महोत्सवाने नाशिकमधील हॉटेल व्यवसायाला चालना; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक

शासनाने कायदा करताना वाहतूक संघटनेशी चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, या जाचक कायद्यात नवीन तरतुदी करण्यात आल्या. त्यासंदर्भात सोमवारी सायंकाळी वाहतूकदार संघटनेतर्फे शासनाशी झालेली बोलणी फिस्कटली. मंगळवारीही कायद्यातील नवीन तरतुदींविषयी चर्चा केली जाणार आहे. इंधन ही जीवनावश्यक बाब आहे. त्यावर सर्व वाहतूक अवलंबून आहे. आता इंधनाअभावी राज्यातील सर्वच जनजीवन विस्कळित झाले आहे. मालमोटारीही जागच्या जागी थांबल्या आहेत. मंगळवारी होणार्‍या चर्चेतून तोडगा निघेल, अशी शक्यता श्री. चौबे यांनी वर्तविली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा पेट्रोलपंप डीलर असोसिएशनचे पदाधिकारी गोपाळ पलोड यांनीही मंगळवारी दुपारपर्यंत पुरेल एवढाच पंपांवर साठा शिल्लक आहे. टँकरसह मालमोटारी महामार्गावर ठिकठिकाणी जागच्या जागी उभी करण्यात आल्याचे सांगत मंगळवारी सकाळी एरंडोलनजीक पेट्रोलपंपावर काही वाहनचालकांकडून इंधन वाहतूक करणार्‍या टँकरच्या काचा फोडल्याचा प्रकार घडला असल्याचेही सांगितले. टँकरचालक सुकराम पाटील यांनी, एरंडोल येथील प्रकारामुळे इच्छा असूनही पुढे मार्गस्थ होण्यास भीती वाटते. सावधानता म्हणून मी महामार्गावरच सुरक्षितस्थळी थांबलो आहे, असे सांगितले.