जळगाव – शहरातील सर्व लहान व मोठ्या नाल्यांमधील गाळ काढल्यानंतर तो रहदारीच्या रस्त्यांवर टाकून दिल्याने वाहतुकीस अडथळा व दुर्गंधी निर्माण झाली होती. त्यावर ‘लोकसत्ता’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर महापालिका प्रशासनाने स्वतःची यंत्रणा कामास लावून अखेर मंगळवारपासून गाळ उचलण्यास सुरूवात केली आहे.

पावसाळ्याचे वेध लागल्यानंतर दरवर्षी महापालिकेकडून शहरातील सर्व नाल्यांची सफाई हाती घेतली जाते. त्यानुसार, यंदाही सुमारे २५ लाख रूपयांचा निधी खर्चून नाल्यांची सफाई खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, कंत्राटदाराने नाल्यांमधून निघालेल्या गाळाची व्यवस्थित विल्हेवाट न लावता तो रहदारीच्या रस्त्यांवर तसेच मोकळ्या जागी टाकून दिल्याने आणखी नवीन समस्या तयार झाली आहे. ज्यामुळे सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरली असून, माशा वाढल्याने ठिकठिकाणी अनारोग्य वाढीस लागण्याची शक्यताही बळावली आहे. त्याकडे लक्ष वेधणारे सचित्र वृत्त प्रकाशित करून लोकसत्ताने महापालिका प्रशासनाला झोपेतून जागे केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने रस्त्यांवर टाकलेला नाल्यांचा गाळ उचलण्यासाठी कंत्राटदाराच्या विनवण्या न करता आपली स्वतःची यंत्रणा आता कामास लावली आहे. रस्त्यांवरून उचलेला नाल्यांचा गाळ थेट महापालिकेच्या निमखेडी शिवारातील कचरा डेपोत नेऊन टाकला जात असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच एकदा कचरा व गाळ उचलल्यानंतर तो तिथे पुन्हा टाकण्यात येणार नाही, याची खबरदारी घेण्याची अपेक्षा सुद्धा व्यक्त केली आहे.