नाशिक: प्रत्येक महिन्याला साधारणत: चार ते पाच हत्या, मध्यरात्री सातपूरमध्ये हॉटेलचे प्रवेशद्वार पेटविण्याचा प्रयत्न, गोदा घाटावर खिशातून पैसे हिसकावणाऱ्यास विरोध केल्यावरून भर बाजारात युवकाची हत्या, किशोर सूर्यवंशी मार्ग भागात टोळक्याचा धुडगूस… दिवसागणिक उंचावणाऱ्या गुन्हेगारीच्या आलेखाने नाशिकमध्ये चालले तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. अनेक घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसत असून बालगुन्हेगारीने डोके वर काढल्याचे चित्र आहे.

काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लूटमार, मद्यपींचा धुडगूस, कोयता घेऊन फिरणे, मारहाण, हत्या हे प्रकार राजरोस घडत आहेत. अलीकडेच प्रेम प्रकरणाच्या संशयावरून सातपूर भागात युवकाची हत्या झाल्याची घटना ताजी असताना बुधवारच्या आठवडे बाजारात वडिलांच्या खिशातून पैसे हिसकावणाऱ्या टोळक्याला विरोध केल्यावरून १९ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये प्रत्येकी दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे.

शहरात महिन्याकाठी चार ते पाच हत्या होत आहेत. जानेवारीमध्ये पाच, फेब्रुवारीत चार, मार्च महिन्यात पाच, एप्रिलमध्ये चार आणि मे महिन्यात चार अशा आतापर्यंत जवळपास २२ हत्या झाल्याची आकडेवारी आहे. हत्या, हाणामारी, हल्ला अशा अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग अधिक्याने असल्याचे दिसून येते. हत्याच्या घटनांमध्ये पोलिसांनी तातडीने तपास करून संशयितांना जेरबंद केले आहे. झोपडपट्टी भागात अकस्मात तपासणी मोहिमा राबविल्या जातात. सराईत गुन्हेगारांची छाननी केली जाते. इतके सारे करूनही गुन्हेगारी मात्र आटोक्यात येत नसल्याने पोलीसही हतबल झाल्यासारखी स्थिती आहे.

या घटनाक्रमात मध्यरात्री सातपूर येथील घटनेची भर पडली. आयटीआय सिग्नल चौकालगत कुमारा रेस्टॉरंट ॲण्ड बारचे प्रवेशद्वार काही युवकांनी पेटविण्याचा प्रयत्न केला. एक, दीड महिन्यांपूर्वी संशयित या हॉटेलमध्ये मद्यपान करण्यास आले होते. तेव्हा हॉटेल चालकाशी त्यांचे वाद झाले. या रागातून त्यांनी रात्री ज्वलनशील पदार्थ फेकून हॉटेल पेटविण्याचा प्रयत्न केला. यात प्रवेशद्वारावरील फलक जळाला. हॉटेलचे कुठलेही नुकसान झालेले नाही, असे पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात हत्या सत्र

जानेवारीमध्ये पाच, फेब्रुवारीत चार, मार्च महिन्यात पाच, एप्रिलमध्ये चार आणि मे महिन्यात चार अशा या वर्षात आतापर्यंत जवळपास २२ हत्या झाल्याची आकडेवारी आहे. लूटमार, घरफोडी, वाहन तोडफोड, अशा घटनांची तर मोजदादच नाही. सलगच्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिकच्या शांततेला बाधा निर्माण झाली आहे.