नाशिक – ई. पी. एफ. (९५) निवृत्तीवेतनधारकांना दरमहा नऊ हजार रुपये निवृत्तीवेतन, पाच हजार रुपये महागाई भत्ता, मोफत आरोग्य सुविधा, अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा ई. पी. एफ. पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने बुधवारी अतिशय वर्दळीच्या त्र्यंबक नाका चौकात रास्ता रोको करण्यात आला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मध्यवर्ती चौकात ठिय्या देत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

ई. पी. एफ. निवृत्तवेतनधारकांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने वेळकाढू धोरण अवलंबले आहे. सरकारच्या कार्यशैली विरोधात हे आंदोलन असल्याचे संघटनेचे पदाधिकारी रमेश सूर्यवंशी, चेतन पनेर, डी. बी. जोशी, सुभाष काकड आदींनी म्हटले आहे. संघटनेचे पदाधिकारी व निवृत्तीवेतनधारक प्रथम इदगाह मैदानावर जमले. तिथून मोर्चाद्वारे त्र्यंबक नाका चौकात येऊन त्यांनी रास्तारोको केले. लाल झेंडे व मागण्यांचे फलक घेऊन काही जण सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवृत्तीवेतनधारकांचे प्रश्न मांडले जात असल्याचा दावा आंदोलकांनी केला.

हेही वाचा – मनरेगा योजनेतून तुती लागवड, रेशीम शेतीस प्रोत्साहन; नाशिक जिल्ह्यातील ४२३ शेतकऱ्यांची निवड

हेही वाचा – दीड हजार बालकांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया रखडल्या! वयोमर्यादा वाढविण्यात केंद्राकडून उदासीनता…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात ७५ लाख तर नाशिक जिल्ह्यात सव्वालाख ईपीएफ निवृत्तीवेतनधारक आहेत. यात बॉश, एचएएल, एसटी. वीज मंडळ, साखर कारखाने यासह १८६ उद्योगातील निवृत्ती वेतनधारकांचा समावेश आहे. मागील १० वर्षांपासून त्यांच्या मागण्या प्रलंबित असून आंदोलनाच्या माध्यमातून त्याकडे लक्ष वेधण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व ज्येष्ठांना रेल्वे, एसटी प्रवासात सवलत लागू करणे, १८६ सेक्टरमधील सर्व कर्मचाऱ्यांना ईपीएफ (९५) निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. आंदोलकांनी चौकातील एका मार्गावर ठिय्या देऊन घोषणाबाजी केली. त्र्यंबक नाका हा अतिशय वर्दळीचा चौक आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतुकीत अडथळे आले. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना रस्त्यावरून बाजूला नेले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.