अनिकेत साठे
नाशिक : नगरविकासमंत्री राहिल्याने महापालिकेतील पक्षाच्या बहुतांश नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध येत गेला. शिंदे यांना भाजपशी युती केल्यानंतर मुख्यमंत्री पद मिळाले असले तरी या गटाचे भवितव्य काय असेल, हे जोखूनच वैयक्तिकदृष्टय़ा राजकीय कारकीर्दीचा विचार नगरसेवक करतील. एकदम कुणी हवेत उडी घेणार नाही. महापालिका निवडणुकीस वेळ आहे. त्यामुळे कुणाला घाई नाही. म्हणूनच खा. संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात दादा भुसे आणि सुहास कांदे या बंडखोरांच्या काही समर्थकांचा अपवादवगळता सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली असली, तरी कुणाच्या मनात काय चाललंय, याचा थांग लागणे अवघड आहे.
खा. संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिक येथे पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा मेळावा झाला. समस्त माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर एकत्र आणत नाशिकची शिवसेना जागेवरच असल्याचे राऊत यांनी छातीठोकपणे सांगितले. पण ती जागेवर असल्याची कारणे नंतर महापालिकेच्या राजकारणात मुरलेल्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी खासगीत उलगडली. म्हणजे कुंपणावर बसलेले अंदाज घेत आहेत. मेळाव्यात सेनेचे खा. हेमंत गोडसे हे अनुपस्थित राहिले. दिल्लीतील खासदारांच्या बैठकीत ते सहभागी झाल्याची चर्चा होती. मुंबई, ठाण्यानंतर नाशिक हा सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. कालांतराने ती ओळख पुसट झाली. पण, शिवसेनेच्या लेखी नाशिकचे महत्त्व अबाधित राहिले. त्यामुळे आमदारांच्या बंडखोरीनंतर संघटनात्मक पडझड रोखण्यासाठी राऊत यांनी पहिल्यांदा नाशिकला धाव घेतली. उत्तर महाराष्ट्रातून दोन मंत्र्यांसह एकूण आठ (सेना पुरस्कृत दोघांसह) आमदार शिंदे गटात सहभागी झाले. पक्षात बंडखोरी न केलेला विधानसभेचा एकही आमदार सध्या उत्तर महाराष्ट्रात राहिलेला नाही. फुटीचे ग्रहण संघटनेला लागू नये म्हणून शक्तिप्रदर्शनातून राऊत यांनी बंडखोरांना आव्हान दिले. जळगावचे माजी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना लक्ष्य केले होते. त्याची परतफेड मेळाव्यात झाली. गुलाबरावांना ५० खोकी पचणार नाहीत. आमदारांच्या बंडखोरीचे खोकेबाजी हेच कारण आहे. जे आमदार झाले, त्यांची आमदार व्हायची लायकी होती का, अशा शब्दांत राऊत यांनी बंडखोरांचा समाचार घेतला.
बंडखोरांवर टीका
पक्षाने मानसन्मान देऊनही ते एका रात्रीत पळून गेले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेतला. याकडे लक्ष वेधत एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री असल्याचे अधोरेखित करण्यात आले. बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांना एकसंधपणे उभे करण्याचा प्रयत्न मेळाव्यातून झाला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरांना शेलक्या शब्दात सुनावले. मात्र, राऊत यांनी नाशिकच्या बंडखोर आमदारांचा नामोल्लेख करणे टाळले. माजी कृषिमंत्री तथा मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे हे शिंदे गटात गेले आहेत. ठाणे, नवी मुंबईत पक्षाचे नगरसेवक बंडाचे निशाण फडकावत असताना नाशिकमध्ये तशी परिस्थिती अद्यापतरी उद्भवलेली नाही. बंडखोरी करणाऱ्यांचा नाशिक महापालिकेत प्रभाव नाही. शहर आणि ग्रामीण भागात राऊत यांनी संघटनात्मक बांधणी केली आहे. त्यामुळे नाराजांपेक्षा स्थानिक पातळीवर त्यांना मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे. भुसे गटाचा मालेगाव महापालिकेत वरचष्मा आहे. नगरविकास खात्यामुळे नाशिकच्या नगरसेवकांचे शिंदे यांच्याशी संबंध येत गेले. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती चिंतेचा विषय आहे. तूर्तास बंडखोरीचे पडसाद उमटले नसले तरी भविष्यातील परिणाम टाळण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. पण त्यांनी नाशिकवगळता धुळे, जळगाव आणि नंदुरबारकडे फारसे लक्ष दिलेले नाही. पारोळा-एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांनी माजीमंत्री गुलाबराव पाटील यांच्या त्रासाला वैतागून पक्ष सोडल्याचे म्हटले आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये शिवसेना वाढू दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत पक्षाकडे वारंवार दाद मागूनही दखल घेतली गेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. उत्तर महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यावर वेळीच उपाय न शोधल्याची किंमत पक्षाला मोजावी लागल्याची शिवसैनिकांची भावना आहे.