रस्त्यावर वाहन चालविताना प्राथमिक नियमांचे पालन केले जात नाही. परिणामी अपघात होऊन मृत्यू वा जखमी होण्याच्या घटना वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ नाशिक अंतर्गत कार्य करणाऱ्या रोटरॅक्टच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील प्रमुख दहा सिग्नलवर संबंधितांनी वाहतूक शिस्तीचे धडे दिले.

शहरातील बेशिस्त वाहतुकीने निर्माण झालेली समस्या गंभीर स्वरुप धारण करत आहे. साधारणपणे रस्त्यावरून नियमितपणे वाहतूक करणारे ८० टक्के नागरिक स्थानिक असतात. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास अनेकांना अपघातात प्राण गमवावे लागले. बहुतेक रस्ते गुळगुळीत झाल्याने वाहनचालकांकडून वेगाने वाहने चालवली जातात. तर अनेकदा सिग्नलचे पालन केले जात नाही.

रोटरॅक्ट क्लब ऑफ गुरुगोविंद सिंग तंत्रनिकेतन महाविद्यालय, रोटरॅक्ट क्लब ऑफ नाशिक मेट्रो, रोटरॅक्ट क्लब ऑफ एमजीव्ही  फार्मसी महाविद्यालयय, केटीएचएम, सपकाळ महाविद्यालयाच्या जवळपास १५० हून अधिक विद्यार्थी आणि विद्यर्थिनीं रस्ता सुरक्षा अभियान उपक्रमात सहभागी झाले होते.

गाडी चालविताना भ्रमणध्वनी टाळा, हेल्मेट घाला, सीटबेल्ट लावा, गरज नसताना गाडी बंद करा असे वाहतुकीचे साधे-सोपे नियम त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी दत्त मंदिर सिग्नल, विजय ममता, पिनॅकल मॉल, सिटी सेंटर मॉल, एबीबी चौक, त्रिमूर्ती चौक, जेहान सर्कल, जुना गंगापूर नाका, पेठ नाका, तसेच मालेगाव स्टॅन्ड अशा १० सिग्नल्सची निवड करण्यात आली.

उपक्रमास वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अजय देवरे तसेच वाहतूक पोलिसांचे सहकार्य लाभले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय रोटरॅक्ट प्रमुख लावण्य चौधरी आणि शीतल राजपूत, मुकुल सातभाई, अध्यक्ष राधेय येवले, सचिव मुग्धा लेले आदींनी परिश्रम घेतले.