लोकसत्ता वार्ताहर

धुळे: शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्षातर्फे मनपा अधिकार्यांच्या दालनात पाण्याच्या बाटल्यांची भेट देऊन ’पाणी पाजा’ आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे, रस्ते दुरुस्ती करण्यासह पाणी टंचाई दूर करण्याच्या मागणीसाठी धुळे शहर जिल्हा काँग्रेसने महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.

मुबलक पाणीसाठा असतानाही धुळेकरांना आठ ते १० दिवसाआड पाणी देण्यात येत असल्याचे समाजवादी पक्षाने म्हटले आहे. शहरातील वडजाई भागासह देवपूर भागात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. सत्ताधारी भाजपच्या महापौरांसह अन्य पदाधिकार्यांचा मनपा प्रशासनावर वचक नाही. पाणी पुरवठा विभागातही मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनात डॉ.सर्फराज अन्सारी, जमिल मन्सूरी, मुक्तार मन्सूरी, अकिल अन्सारी, जिया अन्सारी, नेहाल अन्सारी, गुड्डू काकर सहभागी झाले होते. काँग्रेसने मनपा प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदेालन केले.

आणखी वाचा- एकनाथ खडसे यांना का हवा खानदेश महाराष्ट्रापासून वेगळा? गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनपा हद्दीतील गावांमध्ये रस्ते, गटारी, पथदिवे, टंचाईसह अनेक समस्या आहेत. देवपूर, वलवाडीसह विविध भागातील रहिवासी वसाहतींमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. वेगवेगळ्या विकास कामांच्या नावाखाली रस्त्यांवर चार्या खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे. शहराला नियमीत पाणी पुरवठा देण्याच्या वल्गना सत्ताधार्यांनी केल्या. परंतु, पाणी प्रश्न कायम असल्याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे. शहर अध्यक्ष डॉ.अनिल भामरे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस युवराज करनकाळ, शाबीर शेख, अर्चना पाटील, हरी अजळकर आदी यावेळी उपस्थित होते.