नाशिक – नाशिक हे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले शहर आहे. परंतु, या शहराचा त्यांनी अनाथआश्रम करून टाकला. त्यांनी दोन दिवस संपूर्ण शहरात फिरावे. बरोबर प्रत्येक पक्षाचे दोन माजी नगरसेवक घ्यावेत. शहरातील कचरा, रस्त्यावरील खड्डे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अशा वेगवेगळ्या समस्या जाणून घ्याव्यात. शहराची काय वाट लागली ते तुम्हाला कळेल, अशी टीका शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली.
महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी नाशिक दौऱ्यावर आलेले खासदार राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य तसेच केंद्र सरकारच्या कार्यशैलीवर त्यांनी ताशेरे ओढले. कुंभमेळ्यासाठी साडेसहा हजार कोटींचा निधी दिला जाणार आहे. प्रयागराज पासून नाशिकपर्यंत तो किती आणि कसा येतो, कुठे खर्च केला जातो, हे पहायला हवे.
प्रयागराज कुंभमेळ्यात ठेकेदार गुजरातचे होते. नाशिक मध्येही तेच होणार आहे. साडेतीन वर्षांपासून प्रशासकाच्या माध्यमातून महापालिका लुटल्या जात आहेत. आयुक्तांच्या खांद्यावर बंदुका ठेवत लुटमार सुरू आहे. निवडणुका होऊ दिल्या नाहीत. ही कुठली लोकशाही, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. नागरिकांना प्राथमिक सुविधांसाठी अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राज्याच्या प्रश्नांविषयी गांभीर्य नाही. ठेकेदारांकडून पैसे घेणे, पक्ष फोडणे, पैसे वाटणे हीच कामे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
नाशिकला अद्याप पालकमंत्री नाही. पालकमंत्र्यांशिवाय काय अडले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले ते खरे आहे. इतर ठिकाणी असलेले पालकमंत्री काय दिवे लावत आहेत हे पाहून घ्या. पैसे लुटमार करण्यासाठी पालकमंत्रीपद तयार करण्यात आले आहे. लाडक्या बहिणी योजनेतील घोटाळ्यासाठी अर्थ विभाग जबाबदार आहे. अर्थ खात्यातून ही लूट झाली असल्याने अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राऊत यांनी केली.
फडणवीस शंकराचार्य झाले का ?
नाशिक येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री यांनी एक हैं तो सेफ हैं, असा नारा दिला. आपण हिंदू आहोत. सनातन धर्म मानतो, असे ते म्हणाले. फडणवीस आता शंकराचार्य महाराज झाले का, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.