नाशिक – मराठा आरक्षणासाठी येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी ४८ व्या दिवशी भेट देण्यासाठी आलेले शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आजपर्यंत तुम्ही कुठे होतात, केवळ निवडणुकीत मराठा हवा का, असे धारेवर धरत माघारी फिरा, संसदेत मराठा आरक्षणावर बोला, असे आंदोलकांनी सुनावले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजीनामा का देत नाहीत, अशी विचारणाही करण्यात आली.

हेही वाचा >>> मराठा आंदोलनाचा एसटी सेवेला ब्रेक, नाशिक ते छत्रपती संभाजीनगर बस फेऱ्या रद्द

जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर सकल मराठा समाजाचे उपोषण सुरू आहे. नाना बच्छाव यांनी रविवारपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. जिल्ह्यात ५५० हून अधिक गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाने विरोध केल्याने सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार वितरण सोहळा स्थगित झाला आहे. या घटनाक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जनजाती सुरक्षा मंचच्या कार्यक्रमात नोंदविलेल्या सहभागावर मराठा उपोषणकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. सोमवार हा स्थानिक पातळीवरील आंदोलनाचा ४८ वा दिवस. या काळात शेकडो संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी भेट देऊन आरक्षणास पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु, आजतागायत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे उपोषणस्थळी आले नव्हते. सोमवारी गोडसे आंदोलनस्थळी आल्यानंतर आंदोलकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. इतके दिवस तुम्ही कुठे होतात. निवडणुकीत मराठा हवा, मग अडचणीत त्याला एकटे सोडता का, असा जाब विचारला. आंदोलन स्थळावरून माघारी फिरण्याच्या घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षणाबाबत इतकी आत्मियता असेल तर, संसदेत या विषयावर आवाज उठवा, खासदारकीचा राजीनामा का देत नाही, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले. यावेळी नाना बच्छाव, सचिन पवार, संजय देशमुख, ॲड. कैलास खांडबहाले, सचिन निमसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> आरक्षणासाठी जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक; नेत्यांसह मंत्र्यांना गावबंदी, कँडल मार्च, पदाधिकाऱ्यांचे उपोषण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोडसे यांचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा पाठवला आहे. आरक्षणाअभावी मराठा समाजातील मुलांची अडचण होत आहे. गुणवत्ता असूनही विद्यार्थी प्रगतीपासून वंचित राहतात. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक मागास नसल्याचा अहवाल आयोगाने यापूर्वी दिला असला तरी याबाबत पुन्हा सर्वेक्षण होण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षणाचा प्रश्न न सुटल्याने सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. मराठा समाजाच्या भावनांचा राज्यभर उद्रेक होत आहे. त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आपण आपल्या पक्षाचे लोकसभा सदस्य असल्याने खासदारकीचा राजीनामा आपल्याकडे देत असल्याचे गोडसे यांनी म्हटले आहे.