नाशिक : महानगरपालिकेत वीज यंत्रणेशी संबंधित लहानसहान कामांचे ठेके घेणारे सुधाकर बडगुजर यांचा मागील काही वर्षांतील उत्कर्ष डोळे दिपवणारा आहे. ठेकेदार साधारणत: भक्कम राजकीय सावलीखाली शासकीय दरवाजे स्वत:साठी खुले करून घेतात. या कौशल्यामुळे महापालिकेत सत्ता कुणाचीही असली तरी बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीची प्रगती वेगाने झाली.
शिवसेनेच्या ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी. बारावीपर्यंत शिक्षण झालेले बडगुजर यांच्या नावावर मागील वर्षी साडेपाच कोटींच्या मालमत्तेची नोंद होती. तीन दशकांपूर्वी महापालिकेत इलेक्ट्रिकल कंत्राटदार म्हणून त्यांनी व्यावसायिक कामास सुरुवात केली होती. लहानसहान कामे करताना त्यांनी राजकीय पक्षाचा प्रभाव जवळून अनुभवला. पुढे ते तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेच्या जवळ गेले. नेत्यांशी संधान साधून त्यांनी ठेकेदारीत हळूहळू जम बसवला. मनपातील पाणी मीटर बसविण्याचे मोठे कंत्राट पदरात पडल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले.
महापालिकेत पहिल्यांदा ते २००७ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. नंतर शिवसेनेत प्रवेश करून व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर अल्पावधीत त्यांनी एकाच वेळी राजकीय व व्यावसायिक उत्कर्ष साधला. महापालिकेतील म्युनिसिपल कामगार संघटनेचे प्रमुख म्हणून काम पाहत त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली. बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीतून आपण कधीच बाहेर पडलो असून तिच्याशी संबंध नसल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात असला तरी यासंदर्भात बनावट कागदपत्रे सादर करून महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. बडगुजर कंपनीने पुढे रस्ते, पथदीप आणि इतर कामांचे ठेके घेण्यास सुरुवात केली.
लातूर, नागपूरपर्यंत विस्तार
या कंपनीचा कारभार नाशिकपुरताच मर्यादित राहिला नाही. लातूर व नागपूरसह इतर भागापर्यंत तो विस्तारला. लातूर येथील थेट जल वाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची पम्पिंग बसविण्याचे कामही त्यांना मिळाले होते. शिवसेनेत प्रदीर्घ काळ काम करूनही पदाधिकाऱ्यांना जी महत्त्वाची पदे मिळाली नाही, ती बडगुजरांनी एकापाठोपाठ एक मिळवली होती. महापौर, विधानसभेची उमेदवारी त्यांना सहजपणे मिळाली. खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. पक्षाला, पक्षीय कार्यक्रमांना आर्थिक बळ देऊन कुठलीही गोष्ट अनुकूल करून घेण्यात ते वाकबगार आहेत असे शिवसैनिक सांगतात.