चारुशीला कुलकर्णी करोनाच्या पार्श्वभूमीवर, मार्च अखेरपासून देशासह राज्यात लागू झालेल्या टाळेबंदीत वाहतुकीवर निर्बंध आले. या काळात खासगी, सार्वजनिक वाहतूक बंद राहिली. अशावेळी करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना आरोग्य विभागाची १०८ रुग्णवाहिका करोनाबाधितांसह अन्य आजारांच्या रुग्णांची खऱ्या अर्थाने आधार बनली. राज्यात एक लाख, नऊ हजार, ६७ रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका धावली. अपघातग्रस्तांच्या मदतीलाही धावून आली. तसेच करोनाबाधित रुग्ण, गर्भवती, अन्य आजाराच्या गंभीर रुग्णांसाठी ती जीवनदायिनी ठरली. राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असतांना सरकारी, खासगी रुग्णालये करोना बाधितांसाठी अधिग्रहित झाली. या ठिकाणी मधुमेह, डायलिसीस किंवा अन्य आजारांच्या रुग्णांसह ग्रामीण भागातून येणाऱ्या गरोदर मातांपुढेही त्यामुळे समस्या निर्माण झाली. करोनाग्रस्त नसलेल्या रुग्णांसाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस-१०८) रुग्णवाहिका संजीवनी ठरली. रुग्णांना घरापासून सरकारी रुग्णालयापर्यंत नेण्याचे महत्वपूर्ण काम १०८ रुग्णवाहिका सेवेने केले. टाळेबंदीत पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाकडून वाहतुकीची परवानगी मिळवत डॉक्टरांचा दवाखाना गाठणे अनेकांसाठी जिकीरीचे ठरत होते. अशा स्थितीत ग्रामीण भागात विशेषत आदिवासी पाडय़ावर आरोग्य सेवा मिळण्याचा प्रश्न गौण ठरतो. तरीही १०८ च्या रुग्णवाहिकेने रुग्णसेवेचे काम अविरतपणे सुरू ठेवले. राज्याचा विचार केल्यास मुंबईमध्ये २१ हजार ९३, ठाणे दोन हजार ८०१, सिंधुदुर्ग तीन हजार १९७, नागपूर १३०३, पुणे सहा हजार २९३, कोल्हापूर सहा हजार १०३ रुग्णांसाठी रुग्णवाहिका धावली. विशेष म्हणजे दुर्गम, आदिवासीबहुल असलेल्या गोंदिया येथे १५४७, गडचिरोली ५९५, पालघर येथे ५३९ जणांनी रुग्णवाहिकेचा लाभ घेतला. नाशिक जिल्ह्य़ात सहा हजारांवर नागरिकांना उपयोग नाशिक जिल्ह्य़ात सहा हजार ९७२ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवेत तीन हजार ८२२ (करोनाग्रस्त रुग्ण), आत्महत्येचा प्रयत्न किंवा आत्महत्या सहा आणि इतर ४११ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतल्याची माहिती रुग्णवाहिकेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. अश्विन राघमवार यांनी दिली. गर्भवतींना मदतीचा हात गरोदरपणातील नऊ महिन्याच्या कालावधीत नियमित तपासण्यांव्यतिरिक्त अचानक होणारा त्रास पाहता महिलांसाठी १०८ रुग्णवाहिका संजीवनी ठरली. दैनंदिन व्यवहार ठप्प असतांना आवश्यक औषधे मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडाली. अशा स्थितीत १०८ रुग्णवाहिकेला दूरध्वनीवरून माहिती दिली असता संबंधित महिलेस गावातून तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्य़ाच्या ठिकाणी नेण्यात येऊन प्राथमिक उपचार दिले गेले. काही महिलांची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली. या सेवेमुळे माता-बाल मृत्यू रोखण्यास मदत झाली आहे.