जळगाव : अमळनेर तालुक्यातील एका गावात विहिरीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र, प्रथमदर्शनी घातपाताची शक्यता वर्तविण्यात आल्याने, त्याबाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी वाहने जाऊ न शकलेल्या बिकट रस्त्यांचा अडथळा होता. मात्र, घटनेची सत्यता जाणून घेणेही महत्त्वाचे असल्याने थेट बैलगाडी स्वतः हाकत पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळ गाठत सत्यता जाणून घेतली.
अमळनेर तालुक्यातील रडावण या गावशिवारातील विहिरीत नितीन मराठे याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचीही नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांना प्रथमदर्शनी घातपात झाल्याची माहिती मिळाली. त्याबाबतची चर्चाही परिसरात रंगली होती. मात्र, यामागच्या घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी अमळनेर येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देण्याचे ठरविले. गावापासून तीन ते चार किलोमीटरवर शेतशिवारातील विहीर हे घटनास्थळ होते. मात्र, पावसामुळे सद्यःस्थितीत रस्त्यांची वाटच बिकट झाली आहे. रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे घटनास्थळापर्यंत दुचाकी, मोटारही जाऊ शकत नाही, अशी स्थिती रस्त्यांची झाली आहे. त्यात शेतशिवारातील रस्त्यांची तर वाटच लागली आहे. चालणेही मुश्किल झाले आहे.
हेही वाचा >>> नियोजित वेळेआधीच ट्रेन गेली, प्रवाशांना झाला मनस्ताप, कुठे आणि कधी घडलं हे? वाचा…
मात्र, सत्यता जाऊन घेण्यासाठी घटनास्थळी जाणे महत्त्वाचे असल्याने पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सुरुवातीला पायी जाण्याचा निर्णय घेतला. गावातील ग्रामस्थांनी मात्र रस्त्यातून चालणेही कठीण असल्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांना सांगत, ग्रामस्थांनी बैलगाडीची व्यवस्था करून दिली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः बैलगाडी हाकत घटनास्थळ गाठत टळे आणि मृत्यूचे खरे कारण शोधून काढले. सुमारे पाच ते सहा तास घटनास्थळाची त्यांनी पाहणी करीत पुरावे जमा केले. त्यातून त्या व्यक्तीचा घात नव्हे, तर त्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले की, मृत व्यक्ती मनोरुग्ण होती. त्याची पत्नी सोडून माहेरी गेली आहे. त्यानंतर त्याने शेतातील विहिरीत आत्महत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा >>> आता गुन्हेगारांची कुंडली; आयुक्तांचे पोलीस ठाण्यांना आदेश
दरम्यान, जिल्हा पोलीस दलात अनेक लाचेची प्रकरणे घडत आहेत. भुसावळमधील पोलीस अधिकार्याचे प्रकरणही नुकतेच घडले आहे. मात्र, अजूनही पोलीस दलात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कर्मचारी आहेत. आपले कर्तव्य समजून ते काम करीत आहेत. कितीही अडचणी समोर आल्या तरी ते कर्तव्य बजावत असतात. रात्री-बेरात्रीही केव्हाही, कुठेही ते कर्तव्य बजावत असतात, हे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी अडचणींवर मात करीत घटनेची सत्यता जाणून घेत सिद्ध केले आहे.