नाशिक:कोकणात रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू या ठिकाणी शेतकऱ्यांचा होणारा विरोध पाहता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत शेतकऱ्यांचा गैरसमज दूर केला पाहिजे. या प्रकल्पामुळे कोकणचा कायापालट होणार आहे. त्यावरून राजकारण केले जात आहे. हे ठिकाण माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुचविले होते. तसेच या संदर्भात पंतप्रधानांना पत्रही लिहिले होते. वेदांता, फॉक्सकोनसह ज्या ज्या विषयांवर आरोप झाले, त्याचे स्पष्टीकरण देणारी श्वेतपत्रिका आठ दिवसात काढणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

सामंत नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रिफायनरीसंदर्भात राजकारण केले जात असून जालियनवाला बागची तुलना केली जात आहे. ठाकरे यांनीच पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून बारसुमध्ये १३०० एकर जमीन रिफायनरीसाठी देऊ शकतो, असे म्हटले होते. या प्रकल्पामुळे कोकणचा विकास होणार आहे. ठाकरे मुख्यमंत्री असते तर प्रकल्प पुढे गेला असता. केवळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने हा विरोध होत आहे. समृध्दीच्या बाबतीतही तेच झाले होते. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असतांना राजकारण करण्याच्या हेतुने शेतकऱ्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत. उद्योग राज्याबाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. मग आता उद्योग येत असतांना विरोध का करता, असा प्रश्न सामंत यांनी उपस्थित केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३० ते ४० दिवसात या संदर्भातील सर्वेक्षण पूर्ण होणार आहे. जलदपणे कुठलेही काम होणार नाही .सध्या माती परीक्षण केले जात आहे. प्रकल्प करण्यासाठी जागा योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर प्रकल्प करायचा की नाही, हे ठरविण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.