लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: अमरावती येथे विवाह सोहळा आटोपून परतलेल्या अमळनेर येथील विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाला. रूपाली गजेंद्रसिंग राजपूत (33) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत अमळनेर येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या जिल्ह्याचा पारा ४४.९ अंश या उच्चांकी पातळीवर आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अमळनेर येथील विवाहितेला उष्माघातामुळे आपला जीव गमवावा लागला. रूपाली राजपूत या गुरुवारी अमरावती येथे सोहळ्यासाठी गेल्या होत्या. तेथून त्या सायंकाळी परतल्या. आल्यानंतर रूपाली यांना मळमळ, उलट्या व चक्कर आली. त्यामुळे पती गजेंद्रसिंग ऊर्फ अतुल पाटील यांनी त्यांना तांबेपुरा येथील खासगी डॉक्टरांकडे नेते. डॉक्टरांनी उष्माघात असल्याचे सांगत प्राथमिक औषधोपचार केले. मात्र, सकाळी उठल्यानंतर पुन्हा उलट्या, मळमळ व चक्कर आली. त्यांना अमळनेर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासत मृत घोषित केले. याबाबत विवाहितेचा दीर दीपक राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.