विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी काम करण्याची मुभा (वर्क फ्रॉम होम) दिली आहे. त्यामुळे देशात इंटरनेटचा वापर दुपटीने वाढला आहे.

सर्वसाधारणपणे एखादा ग्राहक दिवसाला एक किंवा दोन गिगा बाइटचा वापर करीत असतो, मात्र आता हा वापर पाच ते सहा गिगा बाइट इतका झाला आहे. डोंगल वापरासाठीही जास्त दर द्यावे लागत आहेत.

देशात सध्या आयडिया व्होडाफोन, एअरटेल आणि जिओ या तीन बडय़ा कंपन्या इंटरनेट सुविधा पुरवतात. तर देशात एकुण साडेसहा कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत.

नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कार्यालये असून, रिलायन्स समूहाचे जीओचे टेलिकॉम मुख्यालय घणसोली येथे आहे. ऐरोली येथील माइन्ड स्पेस इमारतीत करोनाचा एक संशयित रुग्ण आढळल्याने ही इमारत सध्या बंद ठेवण्यात आली आहे. नवी मुंबई एमआयडीसीत अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये असून, ‘वर्क फ्रोम होम’ची मुभा संगणक प्रणालीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी घरीच कार्यालये थाटली आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापर दुपटीने वाढला असल्याची माहिती ऐरोली येथील अ‍ॅम्बिशनचे संचालक के. डी. गुप्ता यांनी दिली.