नवी मुंबई : मोरबे धरण परिसरात आतापर्यंत ४१७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहराला सुमारे चार दिवसपाणीपुरवठा करता येईल इतका पाणीसाठा वाढला आहे. स्वतःच्या मालकीचे धरण असलेल्या व जलसंपन्न शहर संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबईला महापालिकेच्या मोरबे धरणात मागील तीन वर्षांतील सर्वाधिक जलसाठा यंदा शिल्लक आहे. धरणात सद्यस्थितीला ४०.७७ टक्के जलसाठा शिल्लक असून याद्वारे पुढील ९७ दिवस म्हणजेच ३ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा करता येणार आहे.
मोरबे धरण गेल्यावर्षी २८ ऑगस्ट २०२४ ला १०० टक्के भरले होते व धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता. महामुंबईत होऊ घातलेल्या व आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दिवसेंदिवस अतिशय सुनियोजित असलेल्या शहराचा दर्जा आणखी वाढत जाऊ लागला आहे. परंतु नवी मुंबई महापालिकेच्या लोकसंख्येच्या मानाने धरणातून अधिक पाणीउपसा केला जात आहे. त्यामुळे पालिकेने पाणी उपशावरही नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.
गेल्यावर्षी मोरबे धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरले होते. यंदाही पावसाने लवकर सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. नागरिकांनीही पाण्याचा योग्य वापर करावा. यंदाही धरण १०० टक्के भरेल, अशी आशा आहे.- अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता, मोरबे प्रकल्प