नवी मुंबई : गेल्या तीन चार दिवसापासून नवी मुंबईतील वाशीत एका बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये एक मद्यपी रोज झोपत असल्याचे दिसून आले. त्यांना अनेकांनी पहिले काहींनी हटकले मात्र तो बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने लोक निघून जात होते. या बाबत वाशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट समंधित  बँकेला १५ दिवासात  सुरक्षा रक्षक नेमणूक करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

एटीएम सेंटरच्या सुरक्षेसाठी व मदतीसाठी सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे. मात्र तरीही अनेकदा बँक अथवा समंधित  एजन्सी सुरक्षा रक्षक ठेवत नाहीत. त्यामुळे अनेकदा सायबर गुन्हे घडतात तसेच रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांचा आश्रय स्थान हे एटीएम सेंटर बनते. मात्र वाशीतील इंडियन बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये तीन चार दिवसापासून एक मद्यपी येतो आणि वातानुकुलीन सेंटर मधील गारेगार हवेत बिनधास्त झोपत असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी बहुसंख्य लोकांसह मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा पैसे काढण्यासाठी करतात. त्याच वेळी, जर नशाबाज किंवा मद्यपी लोक बँकांच्या एटीएम रूमचा वापर झोपण्याकरिता करत असतील, तर त्या खोलीत असलेल्या एटीएम मशीनमधून पैसे काढणे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कितपत सुरक्षित आहे.असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बाबत वाशी मनसेला कळल्यावर त्यांनी रात्रीच्या वेळी या एटीएम सेंटरला भेट दिली त्यावेळी या बँकेचा एकही सुरक्षा रक्षक एटीएम रूमच्या आत किंवा बाहेर आढळलेला नाही. आणि जर एटीएम रूमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमला असेल तर मग नशेडी लोकांना एटीएम रूममध्ये झोपण्याची परवानगी कशी दिली जाते ? आणि अद्याप एटीएम रूमच्या ठिकाणी चौकीदार किंवा सुरक्षा रक्षक उपलब्ध नसल्यास, कोणतीही दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार याचा खुलासा मात्र आपण नक्की करावा. असा जाब पत्राद्वारे त्यांनी समंधित  बँकेला विचारला आहे. 

हेही वाचा >>>नवी मुंबई: वाशी गावातील २६३ अनधिकृत झोपड्यांवर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत मनसे सैनिक सागर विचारे यांनी सांगितले कि या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा आहे. मात्र अनेकांनी दिलेल्या माहिती नुसार तो मद्यपी रोज रात्री एटीएम सेंटर मध्ये झोपतो तरीही तीन चार दिवस घडणारी हि घटना समंधित  लोकांना माहिती नाही याचा अर्थ सीसीटीव्ही फुटेज तपासणी रोजच्या रोज होत नसावी. या बाबत समंधित  बँकेला पत्र दिले असून १५ दिवसात सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन होईल असा इशारा देण्यात आला आहे.  या पत्राची एक प्रत वाशी पोलिसांनाही देण्यात आलेली आहे. असेही विचारे यांनी सांगितले.या बाबत प्रयत्न करूनही समंधित बँक प्रतिनिधींची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.