या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

|| विकास महाडिक

पाच बाजार समित्यांपैकी बाजार आणि माथाडी कामगारांच्या संचालकांची बिनविरोध निवड

नवी मुंबई  : राज्यात सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेल्या नवी मुंबईतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी शनिवार, २९ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. राज्यात सत्तेत असलेल्या ‘मविआ’चे या शिखर समितीवर अप्रत्यक्ष  वर्चस्व राहणार हे स्पष्ट दिसून येत आहे. तुर्भे येथील पाच बाजार समितीपैकी एका बाजाराच्या व माथाडी कामगारांच्या संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. हे दोन्ही संचालक हे ‘मविआ’च्या घटक पक्षांचे प्रतिनिधीत्व करीत असल्याचे दिसून येते.

राज्यात एकूण ३०५ छोटय़ा मोठय़ा बाजार समित्या आहेत. त्यात एपीएमसी तगडी बाजार समिती आहे. सुमारे तीन हजार कोटीची उलाढाल असलेल्या या बाजार समितीच्या संचालक मंडळाची गेली दहा वर्षे निवडणूक झालेली नाही. त्यामुळे शासनाने त्यावर प्रशासक नेमला होता. मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना आदेश दिल्याने ‘एपीएमसी’च्या १८ संचालक पदांसाठी शनिवारी मतदान होत आहे. एकूण २४ संचालक पदापैकी सहा संचालक हे राज्य शासनाकडून नाम निर्देशित केले जाणार आहेत. १८ संचालक हे मतदान प्रक्रियेद्वारे निवडून येणार आहेत. यात सहा महसूल विभागातून १२ शेतकरी प्रतिनिधी आणि तुर्भे येथील पाच घाऊक बाजारांतून प्रत्येकी एक संचालक निवडला जाणार आहे. या पाच बाजारात शेतमालाची चढउतार करणारे हमाल माथाडी तोलारी यांच्यामधून एक प्रतिनिधी संचालक म्हणून निवड केला जाणार आहे.

पाच बाजारापैकी फळ बाजारातील माजी संचालक संजय पानसरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे, तर माथाडी संचालक म्हणून माजी मंत्री शशिकांत यांचीही बिनविरोध निवड यापूर्वीच जाहीर झालेली आहे. शिंदे पानसरे हे दोन्ही संचालक ‘मविआ’तील घटक पक्षाचे सदस्य आहेत. त्यामुळे तुर्भे येथील चार घाऊक बाजारातून शनिवारी चार संचालकांची निवड केली जाणार आहे. या बाजारातील फळ बाजारातून संजय पानसरे यांना सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन एकमताने निवडून दिले आहे, तर शिंदे हे संचालक मंडळात हवे  असल्याने त्यांनाही एकमताने सर्व माथाडी संघटनांनी निवड केली आहे. त्यामुळे आता धान्य बाजारात निलेश वीरा विरुद्ध पोपटलाल भंडारी तर मसाला बाजारात कीर्ती राणा यांना अशोक जैन हे टक्कर देणार आहेत. कांदा-बटाटा बाजारातही यावेळी चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

माजी संचालक अशोक वाळुंज यांना गेली अनेक वर्षे या बाजारात तळ ठोकून असलेल्या राजेंद्र शेळके यांचा सामना करणार आहेत. भाजी बाजारात बिनविरोध निवडीला विरोध करणारे र्मचट बँकेचे अध्यक्ष डी. मोरे यांनी माजी संचालक शंकर पिंगळे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. यात धान्य व मसाला बाजार हे भाजप समर्थक व्यापाऱ्यांची बाजारपेठ आहे. त्यामुळे निवडून येणारे संचालक हे भाजप वा सरकारला आपले म्हणणारे असणार आहेत, मात्र भाजी, कांदा, आणि फळ या तीन बाजारपेठांवर मविआचे विशेषत: राष्ट्रवादीचे वर्चस्व राहणार आहे. सहा महसूल  विभागांतून प्रत्येकी दोन असे १२ संचालक एपीएमसीत येणार आहे.  यातही काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात बलाढय़ घाऊक बाजार समितीवर यावेळी मविआचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट दिसून येत आहे.

‘मविआ’चे पॅनेल

राज्यात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि आता पालिका निवडणुकीप्रमाणे या बाजार समितीच्या संचालक पदासाठी मोठय़ा प्रमाणात मतदारांना लक्ष्मी दर्शन देण्यात आले आहे. त्यामुळे एका मतासाठी यावेळी चार ते पाच हजार किंमत लावली गेल्याचे समजते. या निवडणुकीत ‘मविआ’ने एक पॅनल तयार करून भाजपला लढत दिली आहे. भाजपला ऐनवेळी उमेदवारही न मिळाल्याची चर्चा आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apmc mahavikas alliance five market committee mathadi labor worker akp
First published on: 29-02-2020 at 00:12 IST