नवी मुंबई : सीबीडी, बेलापूर परिसराला सोमवारच्या मुसळधार पावसात आलेले पूरसदृश रुप हा महापालिकेतील अभियांत्रिकी विभागाकडून झालेल्या अक्षम्य असा चुकांचा परिणाम असल्याचा निष्कर्ष आता काढला जात आहे. शहरातील नाले, गटारांमधून खाडीच्या दिशेने वाहत येणारे पाणी धारण तलावातून खाडीत सोडण्यासाठी असलेल्या मोठ्या पाइपांमध्ये काँक्रीटचा भराव आढळून आला असून या वाहिन्या बंद झाल्यामुळे बेलापूर पुरात सापडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

नवी मुंबई महापालिका, सिडको, कोकण भवन यासारख्या शासकीय प्राधिकरणांसह व्यावसायिक, नागरी संकुलांचे मोठे केंद्र मानल्या जाणाऱ्या बेलापुरात सोमवारच्या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. भरती-ओहोटीच्या चक्रात मुसळधार पावसाचे पाणी खाडीत सोडण्यासाठी निर्माण करण्यात आलेली धारण तलावांची रचना अपयशी का ठरली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. सीबीडी, बेलापूर परिसरातील पावसाळी पाणी भरती-ओहोटीच्या काळात धारण तलावातून खाडीत सोडण्यासाठी सेक्टर ११ भागात महापालिकेचे जुने पंप हाऊस आहे. या पंप हाऊसची दुरुस्ती करावी तसेच येथील जुन्या यंत्रणा बदलाव्यात यासाठी येथील माजी नगरसेवक डाॅ. जयाजी नाथ गेली चार वर्षं सातत्याने पाठपुरावा करत होते.

सुरुवातीला वेगवेगळी कारणे पुढे करणाऱ्या महापालिकेतील अभियांत्रिकी विभागाने दोन वर्षांपूर्वी या पंप हाऊसचे काम सुरू केले खरे मात्र यंदाच्या पावसाळ्यात हे काम पूर्ण झालेले नाही. असे असले तरी केवळ पंप हाऊसचे अर्धवट काम हे एकमेव कारण बेलापूर तुंबण्यामागे नाही हे आता स्पष्ट होत आहे.

नवी मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्वच उपनगरांमध्ये खाडीच्या मुखाशी सिडको आणि महापालिकेने मोठे धारण तलाव (होल्डिंग पाॅण्ड) उभारले आहेत. भरतीच्या काळात पावसाचे पाणी या धारण तलावांमध्ये साठविले जाते आणि ओहोटी सुरू होताच धारण तलाव, खाडीच्या मुखावर बसविण्यात आलेले दरवाजे (फ्लॅप गेट) पाण्याच्या दाबाने उघडून पाणी खाडीत जाण्यास सुरुवात होते. सीबीडी भागात पंप हाऊसचे काम सुरू असल्याने या ठिकाणी अशा स्वरूपाचे दरवाजे बसविण्यात आले नव्हते. पावसाचा जोर वाढला तर धारण तलावातील (होल्डिंग पाॅण्ड) पाणी पंपाच्या साहाय्याने खाडीत फेकण्याची व्यवस्था शहरातील सर्वच तलावांभोवती उभी करण्यात आली आहे. सीबीडी भागातील धारण तलावात खाडीच्या मुखावर अशा २७ मोठया वाहिन्या आहेत. मात्र पंप हाऊसचे काम करत असताना खाडीचे पाणी पुन्हा या कामाच्या ठिकाणी येऊ नये यासाठी येथील वाहिन्या ठेकेदाराने काँक्रीटचे थर टाकून बंद केल्या होत्या असे आता आढळून आले आहे.

सोमवारी पावसाचा जोर वाढला तशी धारण तलावातील पाण्याची पातळी वाढू लागली. ओहोटी सुरू झाल्यानंतर धारण तलावातील पाणी खाडीत जाईल या आशेवर महापालिकेची यंत्रणा होती. मात्र खाडीच्या मुखावरील मोठे पाइप काँक्रीटने बंद असल्याने धारण तलावातील पाण्याची पातळी वाढूनही पाणी खाडीत परतू शकले नाही. विशेष म्हणजे, याच भागात कंत्राटदाराने खाडीच्या मुखावर बांधही टाकले होते. त्यामुळे शहरातील पाणी खाडीत जाणारा मार्ग चहूबाजूंनी बंद झाला. त्याचा मोठा फटका सीबीडी बेलापूर परिसराला बसल्याचे आता दिसून येत आहे.

खाडीचा बांध आयुक्तांनी हटविला

पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतरही सीबीडी, बेलापूरमधील पुराचे पाणी कमी होत नसल्याचे लक्षात येताच आयुक्त डाॅ.कैलास शिंदे स्वत: रात्री उशिरापर्यंत धारण तलाव परिसरात ठाण मांडून होते. धारण तलावांमधील पाइप काँक्रीट टाकून बंद झाल्याचे लक्षात येताच आयुक्तांनी खाडीच्या मुखावर टाकलेला बांध काढण्याचे आदेश अभियंत्यांना दिले. रात्री उशिरा हा बांध तोडण्यात आला आणि शहरातील पाण्याचा खाडीत निचरा होण्यास सुरुवात झाली. दरम्यान पंप हाऊसचे काम करताना काँक्रीटने बंद केलेले पाइप तसेच खाडीच्या मुखावर टाकण्यात आलेले बांध ही प्रमुख कारणे बेलापूर तुंबण्यामागे असल्याचे आता स्पष्ट होत आहे. याप्रकरणी अभियंता विभागाकडून उशिरापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.

पंप हाऊसचे काम सुरू असताना पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होणार याचा साधा विचारही महापालिका स्तरावर झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. पंप हाऊसच्या कामात खाडीचे पाणी शिरू नये यासाठी येथील २७ पाइप काँक्रीटने बंद केले गेले. खाडीच्या मुखावर बांध टाकले गेले. त्यामुळे सोमवारचा पूर हा मानवनिर्मित चुकांमुळे आला हे स्पष्ट आहे.

डाॅ.जयाजी नाथ, माजी नगरसेवक

शहरातील पाणी साचण्याबाबत जी समस्या निर्माण झाली ती प्रथम सोडवणे आवश्यक आहे. घटनेमागील कारणाची सखोल माहिती घेऊन त्या समस्येचे निराकारण करणे हे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे संपूर्ण व सखोल माहिती घेतल्यानंतर चुका झाल्या असल्यास योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका