नवी मुंबई : महामुंबई क्षेत्राला २०५० पर्यंत लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन सिडको सध्या करीत असून हेटवणे, मोरबे, बारवी, बाळगंगा, पाताळगंगा, कोंढाणे हे सहा स्रोत अधिक विकसित केले जाणार असून कोंढणे धरणाच्या परिसरातच नेरळजवळ असलेल्या पोशीर धरणाचेही सिडकोच्या वतीने नियोजन सुरू आहे. या धरणातून २५० दशलक्ष लिटर पाण्याची पूर्तता होऊ शकणार आहे.
सिडकोने तयार केलेल्या जल आराखडय़ानुसार २०५० पर्यंत १२७५ दशलक्ष लिटर पाणी लागणार असून या सर्व प्रकल्पातून सिडको १२ दशलक्ष लिटर पाण्याचे जादा नियोजन करणार आहे.
मुंबई किंवा नवी मुंबई पालिकांप्रमाणे सिडकोने स्वत:चे धरण निर्माण केले नाही. राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाला आर्थिक मदत करून बांधण्यात येणाऱ्या धरणातील पाण्यावर हक्क सांगितला. पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून सिडकोच्या नोडसाठी पाणीपुरवठा केला जात होता. यातील काही पाण्याची उचल ही एमआयडीसीच्या बारवी धरणातून केली जात होती. नवी मुंबई पालिकेने ४५० कोटी रुपये खर्च करून जलसंपदा विभागाकडून अर्धवट पडलेले खालापूर धरण घेतले आहे. त्यावरील पाण्यावरही सिडकोचा दावा असून ४५ दशलक्ष लिटर पाणी खारघर, कळंबोली भागासाठी घेत आहे. सुधागड तालुक्यातील बाणगंगा धरणासाठी सिडकोने गुंतणवूक केली होती. मात्र सिंचन घोटाळय़ात हे धरण अडकले आहे.
बाळगंगा, कोंढाणे हे धरण २०२६ ते २०३५ पर्यंत कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पोशीर धरणाचे केवळ कागदावर नियोजन असून हे गाव अतिवृष्टीसाठी प्रसिध्द आहे. सिडकोच्या काही नोडमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवत असून हेटवणे धरणातून पाणीपुरवठा वाढविण्यात आला आहे. विमानतळ, मेट्रो, नैना, कॉर्पोरेट पार्क यासारख्या प्रकल्पांना खूप मोठय़ा प्रमाणात पाण्याची गरज भासणार आहे.
१२७५ दशलक्ष लिटरची गरज
२०५० पर्यंत विकसित होणाऱ्या महामंबई क्षेत्राला १२७५ दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. याच काळात महामुंबईचा झपाटय़ाने विकास होणार असून लोकसंख्या ७० लाखांच्या घरात जाण्याची शक्यता या जल आराखडय़ात स्पष्ट करण्यात आली आहे.
सिडकोचे पाणी नियोजन असे
७० हेटवणे
८४ पाताळगंगा
५२ मोरबे
१४ बारवी
३५० बाळगंगा
२५० कोंढाणे
२०० पोशीर (दशलक्ष लिटर)