नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात पावसामुळे भाज्यांची आवक घटली आहे. गुरुवारी शंभर गाड्या आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या घाऊक दरातही ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे.पुणे, नाशिक, गुजरात येथून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो. मात्र त्या ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे.

पुणे, सातारा, नाशिक, नागपूर तसेच गुजरातमध्ये जोरदार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होत नदी काठच्या काही गावांचे संपर्क तुटले आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजारात भाजीपाला आवकवर परिणाम झाला आहे. बाजारात नियमित ५०० ते ५५० गाडी भाजीपाला येत असतो. गुरुवारी फक्त ४०६ गाडी आवक झाली आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने दरात ३० ते ४० टक्केपर्यंत वाढ झाली आहे. आवक कमी होत आहे. त्यात पावसाने भाज्या खराब होण्याचे प्रमाणही अधिक आहे.

मागील दोन दिवसांपासून परराज्यात तसेच राज्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, तसेच गुजरात येथून भाजीपाला आवक होत नाही. त्यामुळे घाऊक दरात वाढ झालेली आहे.– नाना बोरकर, व्यापारी, भाजीपाला बाजार