नवी मुंबई हे जसे रहिवासी वसाहतींचे शहर आहे तसेच ते औद्योगिक वसाहतींचेही शहर आहे. नवी मुंबईतील जवळपास प्रत्येक उपनगराला ‘एमआयडीसी’ लाभली आहे. या विस्तीर्ण पसरलेल्या एमआयडीसीत अनेक उद्योगधंदे अहोरात्र सुरू असतात. यातील प्रस्थापित कंपन्यांची अनेकांना माहिती असते. मात्र, काही कंपन्या वा उद्योग असेही आहेत, जे देशभर प्रसिद्ध असले तरी ते नवी मुंबईत कार्यरत आहेत.
मुंबईतील कायापालट झालेले छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर छिन्नविच्छिन्न झालेले ताज हॉटेल पाहिले असेल. नूतनीकरणात या प्रसिद्ध वास्तूंच्या काचेच्या तावदानांना आवाज, पाणी आणि उष्णताविरहित काचा लावण्यात आलेल्या आहेत. ह्य़ा सर्व काचा रबाले येथील एका छोटय़ाशा कारखान्यातून वितरित झालेल्या आहेत. आगळी वेगळी काच उत्पादित करणारा हा लघुउद्योजक अवलिया आहे चिन्मय महाराणा. मूळचा ओडिसाचा. सोनाली अर्किटेक्चरल सिस्टीम प्रा. लि. ही त्यांची कंपनी गेली दहा वर्षे ह्य़ा आवाज, पाणी, उष्णताविरहित काचा बनवीत असून आज देशाच्या कानाकोपऱ्यात उभे राहणारे मोठे गृहप्रकल्प तसेच वाणिज्यिक वास्तूंच्या बाहेरील आवरणात या काचेचा भाग आहे. ओडिसी येथील बऱ्हाणपूर जिल्ह्य़ातील एका छोटय़ा गावातून थेट नवी मुंबई गाठणारा हा तरुण केवळ ११ वर्षांपूर्वी या ठिकाणी येऊन एक यशस्वी उद्योजक झाला आहे. मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्रातील मंत्र लक्षात ठेवून पहिली सहा वर्षे एका काच प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यात नोकरी केल्यानंतर या तरुणाने रबाले येथील आर ४११ या जागेत स्वत:चा काच उत्पादनाचा कारखाना सुरू केला. दोन पाळीत या कारखान्यातील काम चालत असून ५५ कामगार दिवसरात्र काम करीत आहेत. अत्यंत उष्ण तापमानात काच आकार घेत असून ३० काचांची तावदाने दिवसाला तयार केली जात आहेत. काच कारखान्यातील नोकरी तशी जोखमीची पण जीवनात काही तरी वेगळे करण्याची मनीषा बाळगून आलेल्या महाराणा यांनी या क्षेत्रात ठसा उमटविला. त्यासाठी हॉलंडच्या ‘युरोपीयन फॉसाद प्रॉडय़ुस’ या कंपनीबरोबर सामंजस्य करार करून ‘सोनाली अर्किटेक्चरल’ कंपनीने त्यांचे तंत्रज्ञान आत्मसात केले. सर्वसाधारण घरांना लागणाऱ्या खिडक्यांच्या काचांमुळे घरात बाहेरील दणदणाट सहज ऐकायला येतो, दिवाळीत तर फटाक्यांच्या आवाजाने कानाच्या कानठळ्या बसतात. पावसाळ्यातील पाणी या काचांवाटे खिडक्यांच्या कोपऱ्यात झिरपत असल्याने बुरशी लागत असल्याचे सहज दिसून येते. उन्हाळ्यात या खिडक्यांमधून येणारी सूर्याची उष्णता अनेकांना नकोशी होते. महाराणा बनवीत असलेल्या काचांमुळे या तिन्ही त्रासांचा प्रभाव ८० टक्के कमी होत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या काचा पर्यावरणाला पूरक आहेत. जीव्हीके कंपनीने मेकओव्हर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाला आता लावण्यात आलेल्या काचा अशाच प्रकारे आवाज, पाणी आणि उष्णताविरहित आहेत. त्यामुळेच धावपट्टीवर ये-जा करणाऱ्या शेकडो कागरे विमानांचा शक्तिशाली आवाज प्रवाशांना ऐकू येत नाही. महाराणांच्या कंपनीने या ठिकाणी ३४ हजार चौरस फूट काचेचे तावदान लावले आहे. अत्यंत कलाकुसरीने तयार करण्यात येणारी ही तावदाने मागणीनुसार बनविण्यात आलेली आहेत. अनेक ठिकाणी सफाईदार वळण घेणाऱ्या काचेने सांभाळणारा तोल अनेकांच्या भुवया उंचविणारा आहे. त्यामुळेच हे विमानतळ आता जगातील काही मोजक्या विमानतळाच्या यादीत जाऊन बसले आहे. काचेचे दोन थर ही तावदाने लावताना ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे पहिल्या काचेतून आवाज आणि उष्णता परावर्तित झाल्यास त्याला दुसरी काच रोखून धरत असून ती घरातील वा कार्यालयातील तापमान नियंत्रणात ठेवण्याचे काम करीत आहे. त्यामुळे आजघडीला चांगल्या सुविधा देणारे गृहप्रकल्प ही काच लावण्याचा आग्रह धरीत आहेत. ह्य़ा काचा भारताच्या दृष्टीने तशा महाग आहेत. पाचशे ते सहाशे रुपये चौरस फुटाने ह्य़ा बाजारात विकल्या जातात. भारतीय जनतेला ह्य़ा निम्म्या दरात विकता याव्यात यासाठी महाराणा यांचा प्रयत्न आहे. पन्नास कोटीपर्यंत सध्या वार्षिक उलाढाल असणाऱ्या या कंपनीचा विस्तार करण्याचे महाराणा यांनी ठरविले आहे. महाराणा यांच्या कंपनीने आतापर्यंत विमानतळासारख्या ८० मोठय़ा प्रकल्पात सहभाग दर्शविला आहे. त्यात ताज हॉटेलसह आयटीसी हॉटेलचाही सहभाग आहे. अनेक आयटी कंपन्यांनी या शिशमहलला पसंती दिली आहे. पर्यावरणयुक्त व ग्रीन संकल्पना राबविणाऱ्या या सुविधेचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळाला पाहिजे, असे जगन्नाथपुरीवासी महाराणा यांना वाटते.