नवी मुंबई : नवी मुंबईतील वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी गुरुवारी वेगवेगळ्या उपायांची जंत्री तयार करणाऱ्या महापालिका प्रशासनाने शुक्रवारी शहरातील बिल्डारांची बैठक घेत त्यांच्याकडून काटेकोर उपायांची अपेक्षा व्यक्त केली. बांधकामाच्या ठिकाणी धूळ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणांहून राडारोड्याची वाहतूक पुढील आदेश येईपर्यत बंद करावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले.

नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता चांगली रहावी यासाठी महापालिकेने गुरुवारपासून वेगवेगळे उपाय आखण्यास सुरुवात केली आहे. वायू प्रदूषणामध्ये बांधकामे करताना उडणारी धूळ हा एक महत्वाचा विषय असून यादृष्टीने बांधकामाशी संबधित घटकांना सतर्क करण्याचे प्रयत्न महापालिका प्रशासनाने सुरू केले आहेत. यासंबंधी आयुक्त नार्वेकर यांनी महापालिका मुख्यालयात बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद यांच्या एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उच्च न्यायालयाने तसेच राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमांची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.

हेही वाचा – सिडकोमध्ये १०० पदांची भरती; मंजूर पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना

बांधकाम प्रकल्पावरून राडारोड्याची अजिबात वाहतूक होणार नाही याचे काटेकोर पालन केले जावे असे यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी साहित्य आणणे अत्यंत गरजेचे असेल तेव्हा ते वाहन पूर्णत: झाकलेले असेल असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. नवी मुंबई महानगरपालिकेने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हवा गुणवत्ता नियंत्रण आराखडा अंगीकृत केला असल्याची माहिती देत त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी व वास्तुविशारदांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले. हे आदेश केवळ खाजगी बांधकाम व्यावसायिकांना वायू प्रदूषण रोखण्याबाबत नाहीत तर महानगरपालिकेमार्फत सुरू असणाऱ्या विविध प्रकारच्या बांधकामांच्या ठिकाणीही वायू प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेत असल्याचा दावा आयुक्तांनी यावेळी केला.

हेही वाचा – मुंबईच्या प्रवेशद्वारावरील खारघर टोलनाक्यावर वाहनांवर पाण्याचा मारा सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी वास्तुविशारद श्री. संतोष सतपथी यांनी बांधकामांमुळे होणारे वायू प्रदूषण व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. याप्रसंगी महापालिका अधिकाऱ्यांसोबत बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईचे अध्यक्ष वसंत बद्रा, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टचे अध्यक्ष शेखर बागुल तसेच बांधकाम व्यावसायिक हितेन जैन, केतन त्रिवेदी, अनिल पटेल, लखाणी त्याचप्रमाणे वास्तुविशारद कौशल जाडिया आणि इतर बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारद मोठ्या संख्येने उपस्थित होत.