उरण : पावसाळ्यातील मासेमारी बंदी लागू झाल्याने हजारो मासेमारी बोटी नांगर टाकून किनाऱ्यावर विसावल्या आहेत. परिणामी मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे मासळीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. याचा फटका खवय्यांना बसू लागला आहे. मात्र पावसाळ्यात शितगृहात साठवून ठेण्यात आलेली व या काळात शेजारील प्रांतातील मासेमारी सुरू होत असल्याने खवय्यांची भिस्त या मासळीवर असणार आहे.
बंदीमुळे मासळीची आवक घटल्याने मासळीच्या दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उरण परिसरात ७०० पेक्षा अधिक मासेमारी बोटी आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ६०० मीटर लांबीचे ‘फिशिंग- डॉक’ करंजा येथे उभारण्यात आले आहे. यामध्ये, मासेमारी बोटीतील मासळी बंदरात उतरवून त्याच्या खरेदीविक्री होत होती ती दोन महिन्यांच्या बंदीमुळे मासळीची आवक बंद आहे. पापलेट, सुरमई,हलवा आणि कोळंबी यासह अनेक चविष्ट माशांचे प्रकार कमी प्रमाणात मिळत असल्याने किलोमागे या माशांचे दर अधिक वाढले आहेत. एका पापलेटच्या नगासाठी १ हजार २०० ते १४०० रुपये मोजावे लागत आहेत. तर अधिक मागणी असलेल्या सुरमईसाठी १ हजार, कोळंबी ५०० तर हलवा ५५० वर जाऊन पोहोचला आहे.
खाडी किनाऱ्यावर मिळणारे मासे
येथील खाडी किनाऱ्यावर आणि चिखलात निवटे,खरब्या खुबे,माकोल,कोळीम,ताजी कोलंबी आदी प्रकारचे मासळीचे प्रमाण मोठे होते. यापैकी अनेक प्रकारची मासळी ही हंगामी असली तर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत होती. स्थानिक मासळीचे प्रमाण कमी झाल्याने मासळीच्या दरात प्रचंड वाढ झाली असून परंपरागत खाद्य असलेल्या मासळीला अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याची माहिती स्थानिक महेश घरत यांनी दिली आहे.