नवी मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर वास्तविक हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध होत असतो. परंतु, यंदा मात्र मुहूर्तालाही हापूसच्या विक्रीवर परिणाम झाला आता हापूस आंब्यांचा हंगाम आणखी केवळ दहा दिवसांचाच आहे, अशी माहिती वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आंबा व्यापाऱ्यांनी दिली.
कोकणच्या हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात असून, पुढील केवळ दहा दिवस हा सुगंधी आणि चवदार आंबा बाजारात उपलब्ध असेल, अशी माहिती एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी दिली आहे. यंदा हवामानातील बदलांमुळे हापूसचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे येत्या १० मे पर्यंतच हापूसचा आस्वाद घेता येणार आहे. आंबाप्रेमींनो, ही संधी दवडू नका, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.
एपीएमसी फळ बाजारात कोकणातून दररोज ४० ते ५० हजार हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक होत असून, एपीएमसीच्या घाऊक बाजारात सध्या पाच डझनाची पेटी १२०० ते १५०० रुपये आणि चार डझनाची पेटी सुमारे २५०० ते ३५०० रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहे.
अक्षय्य तृतीयेला मागणीचा थंड प्रतिसाद
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला हापूसला नेहमी मोठी मागणी असते. मात्र, यंदा बाजारात पुरेसा आणि स्वस्त दरात आंबा उपलब्ध असूनही ग्राहकांचा थंड प्रतिसाद दिसून आला, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. वितरण यंत्रणेतील अडचणी आणि थेट विक्रीमुळे एपीएमसीतील व्यापारावर परिणाम झाल्याचे मत आंबा व्यापारी पवन वाडेकर यांनी व्यक्त केले आहे.
साक्यामुळे दर्जा घटला
साधारणपणे १५ जूनपर्यंत चालणारा हापूसचा हंगाम यंदा १० मे पर्यंतच संपण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यातच हवामान बदलामुळे कोकणातील हापूस आंब्यात ‘साका’ (आतील गर आंबट व पांढरा होणे) निघण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आंब्याच्या दर्जावर आणि उत्पादनावर परिणाम झाला असून, २० ते ३० टक्के आंबा खराब निघत असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे, असे व्यापारी बाळासाहेब भेंडे यांनी सांगितले.
कर्नाटक हापूसच्या विक्रीचा धोका; विश्वासू विक्रेत्यांकडून खरेदी करा
हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी शक्यतो आपल्या ओळखीच्या किंवा विश्वासू हापूस विक्रेत्याकडूनच आंबा खरेदी करावा, असे आवाहन बाळासाहेब भेंडे यांनी केले आहे. त्यामुळे अस्सल हापूसचा स्वाद घेण्यासाठी आता घाई करण्याची गरज असल्याचे मत एपीएमसी फळ बाजारातील व्यापारी आणि संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केले आहे.