नवी मुंबई : नवी मुंबई क्षेत्रातील कांदळवन भागात असलेली अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत. बुधवारी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कांदळवन क्षेत्रात असलेल्या अतिक्रमण संदर्भात बैठकीत नाईक यांनी कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले असून अतिक्रमणाबाबत आढावा घेत कांदळवन भागात ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे रेकॉर्डवर आले आहे ते हटविण्यासंदर्भात निर्देश दिले. तसेच अतिक्रमण कारवाई केल्यानंतर नंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून प्रभावी उपाययोजना करा असे देखील महापालिका प्रशासनास बजावले आहे.
नवी मुंबई महापालिका महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी कांदळवन भागात असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी कशा पद्धतीने कारवाई केली जात आहे आणि कसा तंत्रज्ञानाचा वापर करून कांदळवनाचे संरक्षण केले जात आहे याची सविस्तर माहिती दिली. पालिकेने कांदळवन क्षेत्रात असलेल्या जवळजवळ ७०० पेक्षा अधिक झोपड्या पालिकेने काढल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
नाईक यांच्या समवेत झालेल्या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, नगररचना अधिकारी सोमनाथ केकाण, अतिक्रमण विभागाचे अधिकारी कैलाश गायकवाड तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.