नवी मुंबई : पत्नीचे अन्य व्यक्ती समवेत अनैतिक संबंध असावेत अशा गैरसमजापोटी पत्नीच्या डोक्यात जड वस्तूचा घाव घालून तिला ठार केल्याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार घडल्यावर पती फरार झाला होता मात्र त्याला शोधून रविवारी रात्री अटक करण्यात आले आहे. 

साठ वर्षीय उस्मान सरदार असे यातील आरोपीचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह दारावे  गावातील मारी माता भवन इमारतीत राहतो. त्याच्या पत्नीचे अन्य व्यक्ती समवेत अनैतिक संबंध आहेत असा त्याचा समज होता. यातूनच पती पत्नीचे अनेकदा वाद होत होते. त्यातूनच शनिवारी दुपारी त्यांचे वाद झाले. दुर्दैवाने त्यावेळी घरात कोणी नव्हते. या वादात रागाच्या भरात त्याने पत्नीच्या डोक्यात जड वस्तू घातली. त्या घावामुळे प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला. हे लक्षात येताच त्याने पलायन केले.

आणखी वाचा-उपमुख्यमंत्र्यांना सभेपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून पनवेलकरांच्यावतीने पाच प्रश्न

काही वेळाने जेव्हा त्याचा मुलगा घरी आला त्यावेळी आई निपचित पडलेली त्याने पहिली तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेविषयी माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून फरशीवर रक्ताचे डाग असलेला कापसाचा बोळा, रक्ताने माखलेली ओढणी, रक्ताने माखलेले दोन  चाकू, एक रक्त लागलेला शर्ट जप्त केला आहे. याबाबत त्याचा मुलाने दिलेल्या तक्रारीवरून उस्मान याच्या विरोधात हत्याच गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

घटना घडल्यावर उस्मान पळून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक पथक उस्मान याचा शोध घेण्यासाठी पाठवले. अनेक ठिकाणी शोधल्या नंतर उस्मानच्या वर्णनाचा व्यक्ती जुईनगर रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळताच सागर जाधव यांच्या पथकाने जुईनगर रेल्वे स्टेशन परिसर पिंजून काढत त्याला शोधले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून रविवारी रात्री त्याला अटक करण्यात आले आहे.