पनवेल : पनवेल महापालिकेमधील तळोजा परिसरातील माजी नगरसेवक हरेश केणी यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन भाजपच्या विचारसरणीला रामराम ठोकला आहे. लीना गरड यांच्यावर भाजपने शिस्तभंगाची कार्यवाही केल्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देऊन देणारे केणी हे दूसरे माजी नगरसेवक ठरले आहेत. 

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर पनवेल महापालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवून केणी यांनी महापालिका क्षेत्रात स्वताची छाप निर्माण केली. पनवेल महापालिकेच्या सत्तापटलावर विरोधी बाकावर शेकाप आणि कॉंग्रेस महाविकासआघाडीची सत्ता असल्याने शेकापकडून महापालिकेचे विरोधी पक्षनेता हे पद मिळण्याची चिन्हे संपल्यावर केणी यांनी भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करून भाजपचे कमळ हाती घेतले. शेकापला सोडचिठ्ठीवेळी त्यांच्यासोबत अजून काही सहकारी माजी नगरसेवक सुद्धा सोबत होते. हरेश केणी हे तळोजा परिसरात महापालिकेच्या पूर्वीपासून पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या कारकिर्दीपासून सक्रीय असल्याने गेल्या ३० वर्षात तळोजा वसाहतीच्या उभारणीपासून येथील नागरिक त्यांच्या पाठिशी खंबीर उभे असल्याने त्याच मतदारांच्या पाठिंब्यामुळे महापालिकेत नेतृत्व करण्याची संधी केणी यांना मिळाली होती.

परंतू तळोजा उपनगरात मुस्लिम बहुल वस्ती असल्याने गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या धार्मिक तेढ होणा-या घटनांवेळी भाजपच्या राज्य व स्थानिक पातळीवरून घेतलेल्या भूमिकेमुळे केणी यांची कोंडी सातत्याने होत आहे. आ. प्रशांत ठाकूर आणि मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा तळोजात येऊन हिंदूवादी भूमिका जाहीरपणे मांडल्यामुळे भाजपच्या नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांना तळोजा परिसरातील मुस्लिम मतदारांची मते मिळणे कठीण होणार आहे. मतदार दुखावल्याचा धोका ओळखून भाजपपेक्षा इतर राजकीय पक्षातून महापालिकेची तळोजा उपनगराची निवडणूक लढवायची असल्याने केणी यांनी हा पवित्रा घेतल्याची चर्चा तळोजा परिसरात सुरू आहे. केणी यांनी त्यांचा राजीनामा थेट जिल्हाध्यक्ष आणि आ. ठाकूर यांच्याकडे सोपविण्याएेवजी तो विभागाच्या पदाधिका-यांना सोपविल्यामुळे केणी यांनी भाजप श्रेष्ठींकडून मनधरणीला सुद्धा वाव ठेवलेला नाही. केणी यांनी नवीन कोणता राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणार याबाबत अदयाप स्पष्ट भूमिका घेतली नसली तरी त्यांनी ज्या शेकापमधून तळोजातून निवडणूक लढवली त्याच शेकापसह कॉंग्रेस या पक्षाचा पर्याय केणी यांच्यासमोर खुला असणार आहे. 

मी नाही तर तळोजातील जनता कंटाळली आहे. पनवेल महापालिकेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे तळोजातील रस्ते व पाणी समस्येसोबत मालमत्ता कराचा प्रश्न अद्याप सुटू शकलेले नाही. तसेच वेळोवेळी भाजपच्या विचारसरणीमुळे घेतलेली भूमिका येथील तळोजातील जनतेला मान्य नसल्याची माझ्या समर्थकांचे म्हणने आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला अजूनही कोणत्या राजकीय पक्षासोबत जायचे असा कोणता निर्णय घेतलेला नाही. – हरेश केणी, माजी नगरसेवक