नवी मुंबई: प्रवाशांनी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वे मार्गावरील दिघा ते पनवेल तसेच वाशी ते बेलापूर स्थानकांमध्ये फलाटाच्या दोन्ही टोकांवरील रॅम्प हटवून त्या ठिकाणी लोखंडी रेलिंग बसवले आहे. काही ठिकाणी तर भिंतीही बांधण्यात आल्या आहेत. मात्र, अशा सर्व अडथळ्यांवर मात करत प्रवासी रुळ ओलांडतात.प्रवाशांनी फलाटावरील जिन्यांनी न जाता थेट रेल्वे रुळ ओलांडत प्रवास करण्याचा ‘शॉर्टकट’ मार्ग स्वीकारल्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलांची उपलब्धता वाढवून प्रवाशांना रुळ ओलांडण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही अनेक प्रवासी वेळ वाचवण्याच्या नादात शॉर्टकटच्या मोहात पडत असून आपली सुरक्षाच धोक्यात घालतात. ‘रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.

समुपदेशन, कारवाई, गुलाबाचे फुल देऊन जागरूकता अशा विविध उपक्रमांमधून जनजागृती केली जात आहे. मात्र, प्रवाशांची मानसिकता बदलण्याची गरज आहे,’ असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.विशेष म्हणजे, हार्बर रेल्वे मार्गांवरील सर्वच रेल्वे स्थानके प्रशस्त असून दोन्ही बाजूंनी उतरण्या-चढण्याची सोय आहे. स्थानक परिसर सुटसुटीत असून गर्दीचा ताणही कमी आहे. तरीही काही प्रवासी सर्रास रुळ ओलांडून स्थानकात प्रवेश करत आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढतो आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वे रुळ ओलांडताना अपघात होऊन अनेकांनी जीव गमावला आहे. काही जणांना कायमचे अपंगत्वही आले आहे. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफ, जीआरपी आणि एमएसएफ जवानांची नेमणूक करण्यात आलेली असली, तरी मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे सर्व ठिकाणी लक्ष ठेवणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात रेल्वे पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. त्यासोबतच नागरिकांमध्ये आम्ही जनजागृती उपक्रम देखील राबवत असतो. जिथे जिथे महत्वाची ठिकाणं आहेत, तिथे आम्ही सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवून नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडण्यास प्रतिबंध करण्यासाठी काम करत आहोत.- संजय कुमार द्विवेदी, सहाय्यक सुरक्षा आयुक्त, पनवेल</p>