उरण : औद्योगिक परिसर आणि ग्रामपंचायतीना पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या काठावर असूनही तालुक्यातील एकमेव आदिवासी ग्रामपंचायत असलेल्या रानसईमधील सात पाड्यांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हे म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती आहे.
उरण तालुक्यातील रानसई धरणाच्या परिसरात वसलेल्या रानसई ग्रामपंचायत हद्दीतील वाक्यांतील आदिवासीना वर्षानुवर्षे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ज्या धरणासाठी या आदिवासीच्या जमिनीही संपादीत करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांना आपल्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. १९६० साली उभारण्यात आलेल्या रानसई धरण हे आदिवासींच्या जमिनीवर आहे. यात खैरकाठी आणि भुऱ्याची वाडी या दोन वाक्यांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पाड्यात विहीरी बांधण्यात आल्या आहेत. त्या विहिरीतूनही पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मात्र उन्हाळ्यात विहिरीचे पाणी तळाशी जात आहे. तर येथील बोअरवेललाही पाणी येत नाही. ही पाणी समस्या सोडविण्यासाठी मे महिन्यात दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर हजारो रुपये खर्च केले जात आहेत.
मार्गाची वाडी, खोंडपाची वाडी, बंगल्याची वाडी, सागाची वाडी यांना विहिरीचे पाणी मिळते. मात्र त्यासाठी जलवाहिनीचा वापर करावा लागत आहे. तर रानसईजवळील दोन आदिवासी पाड्याना एकाच बोअरवेलचे प्राण मिळते. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना तासन् तास घालवावे वाहत आहेत. उरण मध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून सर्वत्र कामे सुरू आहेत. प्रतिमाणूस ५५ लिटरप्रमाणे पाणी मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने येथील पाड्यांना जल जीवन मिशन योजनेद्वारे लवकरच पाणी मिळणार असल्याचे उरणने गटविकास अधिकारी समीर वठारकर यांनी सांगितले.