नवी मुंबई:सानपाडा परिसरात एक आगळंवेगळं पोस्टर साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. “हुंडा घेणारा कळवा – ५००० रुपये मिळवा” अशा आशयाचे बॅनर सानपाडा परिसरातील विविध भागात लावण्यात आले आहेत. हा अनोखा उपक्रम शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने राबवण्यात आला असून, हुंडा प्रथेविरोधातील जनजागृती हे या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, हुंडा घेणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस देण्याचं जाहीर आश्वासन या बॅनरमध्ये देण्यात आलं आहे.
सध्या महाराष्ट्रभर खळबळ उडवणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरण या आंदोलना मागची प्रेरणा असल्याचे शिवसेना उबाठा गटाकडून सांगण्यात आले आहे. हुंड्यासाठी वैष्णवीचा करण्यात आलेला छळ. या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली. या दुर्दैवी घटनेमुळे समाजमन ढवळून निघाले असून, हुंडा प्रथेविरोधात तीव्र जनमत निर्माण झाले आहे. यासाठीच जनतेची भावना लक्षात घेऊन हुंडा प्रथेला विरोध करण्यासाठी म्हणून या आशयाचे बॅनर लावण्यात आले असल्याचे शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सानपाड्यातील शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा साधना इंदोरे आणि बाबाजी इंदोरे यांच्या पुढाकाराने हा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरमध्ये नमूद करण्यात आल्यावर हुंडा घेणाऱ्यांविरोधात “ऑपरेशन लग्नकार्य” राबविण्यात येत असून, “माणुसकीच्या शत्रूं सांगे युद्ध आमचे सुरु आहे.” अशी घोषणा देण्यात आली आहे. तसेच “हुंडा घेणाऱ्यांचे नाव कळवणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल,” असे अश्वासही बॅनरच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटाकडून देण्यात आले आहे.
या पोस्टरवर संपर्क क्रमांकही देण्यात आले असून, नागरिकांनी हुंडा मागणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे हुंडा प्रथेविरोधात स्थानिक पातळीवर ठोस पावलं उचलली जात आहेत.
हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा असून, वैष्णवीसारख्या अनेक महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो. महिलांवरील अन्यायाविरोधात अशी जनजागृती गरजेची असून, अशा उपक्रमांचं समाजभर स्वागत केलं जात आहे.
“या बॅनरबाजीतून कोणालाही प्रलोभन देण्याचा हेतू नसून, समाजामध्ये हुंडाप्रथेविरोधात प्रबोधन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हुंडाप्रथेसारखी अनिष्ठ प्रथा अजूनही समाजात सुरू आहे. यामुळे वैष्णवी हगवणे यांचा बळी गेला. मात्र, यापुढे समाजात असे बळी जाऊ नयेत आणि असल्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून समाजात जर कोणी हुंड्याची मागणी करत असेल तर आम्हाला कळवा. अशांविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल.”-बाबाजी इंदोरे, विभाग प्रमुख- सानपाडा, शिवसेना (उबाठा गट)