उरण : समुद्राच्या वाढत्या ओहटीमुळे पंधरा दिवसांतील चार दिवस मोरा ते मुंबई जलवाहतुक पाच तास बंद केली जात आहे. त्यामुळे या मार्गाने उरणवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि विशेषतः नोकरवर्गाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येविरोधात नियमित प्रवाशांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे.

मोरा बंदरातील गाळ हा आधुनिक पद्धतीने काढण्यात यावा. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि जलवाहतूक विभागाने लक्ष घालून ही समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे. ओहोटीच्या वेळी मोरा बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने या मार्गावरील बोटी रुतण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ही सेवा बंद करण्यात येत आहे. मोरा बंदरात गाळ सचण्याची समस्या कायमस्वरूपी आहे. हा गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही ही समस्या सुटलेली नाही. या समस्येला वाचा फोडण्यासाठी प्रवासी दत्ता पुरो यांनी ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा – जेएनपीएच्या सतर्कतेने ५६ जण बचावले; बचावकार्यात पायलट बोटीची महत्त्वाची भूमिका

हेही वाचा – नवी मुंबईतील फ्लेमिंगोचा अधिवास संरक्षित होणार? डीएपीएस तलावात पाण्याच्या प्रवाहावर शिक्कामोर्तब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून उरणच्या मोरा व मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान मोरा मुंबई जलसेवा सुरू आहे. या जलसेवेमुळे उरणवरून विना अडथळा मुंबईत अवघ्या अर्ध्या ते एक तासात या मार्गाने पोहचता येते. त्यामुळे उरण मधील चाकरमानी, व्यवसायिक आणि सर्वसामान्य प्रवासी ही याच मार्गाचा वापर करीत आहेत. मोरा मुंबई जलसेवा ही उरण आणि मुंबई दरम्याची महत्वाची सेवा आहे. मात्र ही सेवा सुरळीत सुरू ठेवण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाची आहे. बोर्डाच्या अभियांत्रिकी विभागाची ही जबाबदारी आहे. मात्र या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ही सेवा खंडित होत आहे.